"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 13:55 IST2026-04-05T13:54:10+5:302026-04-05T13:55:04+5:30
अल-बरदेई हे १९९७ ते २००९ पर्यंत IAEA चे प्रमुख होते आणि २००५ मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे...

"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचे (IAEA) माजी महासंचालक मोहम्मद अल-बरदेई यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. "या वेड्याला कसेही करून तातडीने रोखा, अन्यथा संपूर्ण मध्यपूर्व आगीच्या गोळ्यात लोटला जाईल," असे आवाहन अल-बरदेई यांनी खाडी देश आणि संयुक्त राष्ट्रांना (UN) केले आहे.
ट्रम्प यांच्या धोरणांवर टीका -
मोहम्मद अल-बरादेई यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराण धोरणाचा तीव्र निषेध केला. तसेच, आखाती देशांना आणि संयुक्त राष्ट्रांना या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. त्यांनी 'एक्स'वर अरबी भाषेत लिहिले, "आखाती देशांच्या सरकारांना माझे आवाहन आहे की, हा वेडा मनुष्य संपूर्ण प्रदेशाला आगीचा गोळा बनवण्यापूर्वी, पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण सामर्थ्याने त्याला रोखण्याचा प्रयत्न करावा. तसेच, एका वेगळ्या इंग्रजी पोस्टमध्ये, "हा वेडेपणा थांबवण्यासाठी काहीच करता येणार नाही का?" असा थेट प्रश्नही त्यांनी संयुक्त राष्ट्रांना विचारला आहे.
अल-बरदेई हे १९९७ ते २००९ पर्यंत IAEA चे प्रमुख होते आणि २००५ मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
भीषण जीवितहानी -
ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांचा नवा अल्टीमेटम देऊन 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' उघडण्याची तंबी दिली आहे. मात्र, इराणने ही धमकी धुडकावून लावली आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झालेल्या या संघर्षामध्ये आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले असून जागतिक बाजारपेठ अस्थिर झाली आहे. नागरी वस्त्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे युद्धगुन्ह्यांची भीतीही व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जर ट्रम्प यांची धोरणे अशीच सुरू राहिली, तर संपूर्ण प्रदेश 'आगीचा गोळा' बनू शकतो, असे अल-बरादेई यांनी म्हटले आहे. तसेच, आखाती देशांना युद्ध टाळण्यासाठी राजनैतिक मार्गाने संवाद साधण्याचे आवाहन केले.