... त्यामुळेच इम्रान खानच्या शपथविधीला पंतप्रधान मोदींना निमंत्रण नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 15:23 IST2018-08-06T15:19:21+5:302018-08-06T15:23:39+5:30
पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांचे प्रवक्ते फव्वाद चौधरी यांनी इम्रान यांचे कौतूक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल आणि लालूप्रसाद यांदव या तिघांसाठी एकच व्यक्ती प्रभावी असल्याचे म्हटले होते.

... त्यामुळेच इम्रान खानच्या शपथविधीला पंतप्रधान मोदींना निमंत्रण नाही
नवी दिल्ली - पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांचे प्रवक्ते फव्वाद चौधरी यांनी इम्रान यांचे कौतूक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल आणि लालूप्रसाद यांदव या तिघांसाठी एकच व्यक्ती प्रभावी असल्याचे म्हटले होते. त्याचवेळी, इम्रान यांच्या पंतप्रधानपदासाठीचा शपथविधी सोहळा खुल्या मैदानात पार पडणार असून त्यासाठी सार्क देशा्ंच्या प्रमुखांना आणि क्रिकेटर्संना आमंत्रण देण्यात येणार असल्याचेही म्हटले होते. मात्र, इम्रान यांनी शपथविधी सोहळ्याला कुणीही येणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे मोदींना न बोलविण्याचे कारण काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून इम्रान खान पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी शपथ घेणार असल्याचे समजते. इम्रान यांचा हा शपथविधी सोहळा अतिशय साध्या पद्धतीने होणार आहे. या सोहळ्यातील पाहुण्यांना चहा आणि बत्ताशे देण्यात येतील. मात्र, या सोहळ्याला कुठलाही आंतरराष्ट्रीय नेता हजर राहणार नसल्याचे समजते. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच इतरही राष्ट्रीय नेत्यांना बोलावणे टाळण्यात आले असेल, असे फव्वाद चौधरी यांनी म्हटले आहे. जर मोदींना निमंत्रण दिले असते आणि त्यांनी ते स्विकारले नसते, तर काय ?. तसेच जर मोदी शपथविधी सोहळ्याला हजर झाले असते, तर काही माध्यमांनी इम्रान यांचे जुने व्हिडिओ काढून दाखवले असते. मोदींच्या मित्राला (नवाज शरीफ) इम्रान यांचा धक्का, असेही माध्यमांनी म्हटले असते. तसेच जर मोदींनी कारण पुढे करुन येण्यास टाळल असते, तर पाकिस्तानने मन मोठे करुन मोदींना बालावले पण मोदीच आले नाहीत, असे म्हणत पाकिस्तानचाच उदो उदो झाला असता. त्यामुळे मोदींच्या निमंत्रणामुळे पाकिस्तानचीच प्रतिमा अधिक चांगली झाली असती, असेही चौधरी यांनी म्हटले आहे.