सौदी आता अमेरिकेपासून चार हात लांब; मोहम्मद बिन सलमान यांचा पुतिन यांना फोन, राजकीय पट बदलणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 09:33 IST2026-04-03T09:32:16+5:302026-04-03T09:33:05+5:30
Saudi Arabia And Russia: पुतिन आणि मोहम्मद बिन सलमान यांच्यात इराण युद्ध, इंधन पुरवठा, सुरक्षा यांसह अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.

सौदी आता अमेरिकेपासून चार हात लांब; मोहम्मद बिन सलमान यांचा पुतिन यांना फोन, राजकीय पट बदलणार!
Saudi Arabia And Russia: अमेरिका इराण इस्रायल युद्धाची झळ आखाती देशांना चांगलीच बसत आहे. यातच इराणविरोधात मोर्चा उघडायला आखाती देश तयार नसल्याचे पाहायला मिळत आहेत. सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी रशिचाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांना फोन करून युद्धाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अमेरिकेपासून चार हात लांब ठेवून सौदी अरेबिया आता रशियाशी मैत्री वाढवत असल्याची कुजबुज आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प यांनी एका सार्वजनिक मंचावर प्रिन्सबद्दल अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले. सौदी नेतृत्व आता दबावाखाली असून त्यांनी व्यवस्थित वागण्याची गरज आहे, असे त्यांनी सूचित केले. या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली होती. सौदी अरेबियाने अद्याप अधिकृत प्रतिसाद दिलेला नसला तरी, त्यानंतर उचललेली पावले अनेक गोष्टींचे संकेत देतात, असे म्हटले जात आहे.
मोहम्मद बिन सलमान यांचा पुतिन यांना फोन
पुतिन आणि मोहम्मद बिन सलमान यांच्यात फोनवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी मध्य-पूर्वेतील बिघडत चाललेल्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. इराणसोबत सुरू असलेला संघर्ष, जीवितहानी आणि अत्यावश्यक पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान याबद्दल चिंता व्यक्त केली. पुतिन यांनी स्पष्ट संदेश दिला की, ते सौदी अरेबियाच्या सार्वभौमत्वाच्या आणि प्रादेशिक सुरक्षेच्या पाठीशी उभे आहेत.
दरम्यान, ऊर्जा सुरक्षा हा या दोन्ही नेत्यांमधील चर्चेचा एक प्रमुख मुद्दा होता. इराण युद्धामुळे तेल पुरवठा आणि सागरी मार्गांना असलेला धोका वाढला असून, त्यामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. या संदर्भात तेलाच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि बाजारपेठेतील संतुलन राखण्यासाठी ओपेक+ चौकटीत सहकार्य अधिक दृढ करण्याच्या गरजेवर दोन्ही देशांनी भर दिला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दोन्ही नेत्यांनी लष्करी उपायाऐवजी राजनैतिक दृष्टिकोनावर भर दिला. युद्धविराम, वाटाघाटीद्वारे तोडगा काढण्याच्या गरजेवर जोर दिला.