“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 17:32 IST2025-10-02T17:27:21+5:302025-10-02T17:32:38+5:30
Congress Rahul Gandhi Tour Colombia: भारत आणि चीन पुढील ५० वर्षांत जगाचे नेतृत्व करण्यास तयार आहेत का? या प्रश्नावर राहुल गांधी यांनी भारताबाबत नकारात्मक उत्तर दिले.

“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
Congress Rahul Gandhi Tour Colombia: आर्थिक विकासाबरोबरच भारत नव्या नोकऱ्या निर्माण करू शकत नाही. कारण, अर्थव्यवस्था सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग वाढवण्यात असमर्थ ठरत आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देणारे बहुतेक लोक असे आहेत की, ज्यांनी त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील नोकऱ्या गमावल्या आहेत. चीनने लोकशाही नसलेल्या वातावरणात मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रावर भर दिला अन् करून दाखवले आहे. परंतु आपल्याला लोकशाही चौकटीची आवश्यकता आहे. आपले आव्हान म्हणजे चीनशी स्पर्धा करू शकणाऱ्या लोकशाही व्यवस्थेत मॅन्युफॅक्चरिंग मॉडेल विकसित करणे, असे सांगत काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टीका केली. राहुल गांधीकोलंबिया दौऱ्यावर आहेत आणि एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भारतातील लोकशाहीवर टीका केली.
कोलंबियातील इआयए विद्यापीठात एक संवाद कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, भारतात अनेक धर्म, परंपरा आणि भाषा आहेत. लोकशाही व्यवस्थेत या सर्वांना जागा आहे; मात्र असे असले तरी सध्या तेथील लोकशाही व्यवस्थेवर सर्व बाजूंनी हल्ला होत आहे. या कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांना विचारण्यात आले की, भारत आणि चीन पुढील ५० वर्षांत जगाचे नेतृत्व करण्यास तयार आहेत का? यावर राहुल गांधी म्हणाले की, मला चीनबद्दल माहिती नाही, पण मला वाटत नाही की, भारत स्वतःला जागतिक नेतृत्व म्हणून पाहतो. भारत हा चीनचा शेजारी आणि अमेरिकेचा जवळचा भागीदार देश आहे. आपण या दोन शक्तींच्या अगदी जवळ आहोत, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
लोकशाहीवर सतत होणारा हल्ला हा सर्वांत मोठा धोका
भारताकडे जगाला देण्यासाठी खूप काही आहे. याबद्दल अत्यंत आशावादी आहे. भारतीय व्यवस्थेत काही त्रुटी आणि धोके आहेत, ज्या भारताने दूर केल्या पाहिजेत. सर्वांत मोठा धोका म्हणजे लोकशाहीवर सतत होणारा हल्ला. भारत हा त्याच्या सर्व देशवासींमध्ये संवादाचे केंद्र आहे. वेगवेगळ्या परंपरा, धर्म आणि विचारांना जागा आवश्यक आहे आणि ती जागा निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लोकशाही व्यवस्था. दुसरे म्हणजे देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होणारी विभागणी. येथे अंदाजे १६-१७ वेगवेगळ्या भाषा आणि धर्म आहेत. या विविध परंपरांना व्यक्त होऊ देणे हे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. चीन जे करतो ते आपण करू शकत नाही - लोकांना दडपून टाकणे आणि हुकूमशाही व्यवस्था चालवणे. आपली व्यवस्था ते सहन करणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
दरम्यान, अमेरिकेबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अभियान प्रामुख्याने तेथील बेरोजगारीसंदर्भात आहे. जागतिक स्तरावर भारताच्या वाढत्या प्रासंगिकतेबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, १.४ अब्ज लोकसंख्येसह भारतात प्रचंड क्षमता आहे. परंतु भारताची व्यवस्था चीनपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. चीन खूप केंद्रीकृत आणि एकसमान आहे. भारत विकेंद्रित आहे आणि त्यात अनेक भाषा, संस्कृती, परंपरा आणि धर्म आहेत. भारताची व्यवस्था खूपच गुंतागुंतीची आहे.