पंतप्रधान मोदींकडून काश्मीरला चिनाब ब्रिज अन् वंदे भारत ट्रेनचं गिफ्ट, पाकिस्तानचा तिळपापड; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 10:54 IST2025-06-07T10:52:13+5:302025-06-07T10:54:08+5:30

पहलगाम हल्ल्यासंदर्भात काय म्हणाला पाकिस्तान? जाणून घ्या...

Prime Minister Modi gifts Chenab Bridge and Vande Bharat Train to Kashmir pakistan reaction on pm modi speech in jammu kashmir | पंतप्रधान मोदींकडून काश्मीरला चिनाब ब्रिज अन् वंदे भारत ट्रेनचं गिफ्ट, पाकिस्तानचा तिळपापड; म्हणाला...

पंतप्रधान मोदींकडून काश्मीरला चिनाब ब्रिज अन् वंदे भारत ट्रेनचं गिफ्ट, पाकिस्तानचा तिळपापड; म्हणाला...

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येते झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मिर दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी जगातील सर्वात उंच रेल्वे पूल 'चिनाब ब्रिज'चे उद्घाटन केले आणि तो देशाला समर्पित केला. यावेळी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानवर थेट हल्ला चढवत, 'त्यांनी पहलगाममध्ये मानवता आणि काश्मिरीयत (काश्मीरची सांस्कृतिक ओळख) यावर अत्यंत निंदनीय हल्ला केला असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधानांच्या या विधानानंतर पाकिस्तानचा अक्षरशः तिळपापड उडाला आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "पाकिस्तान हा गरिबांची भाकरी आणि रोजगाराचाही शत्रू बनला आहे. तसेच, जो कुणी काश्मीरचा विकास रोखण्याचा प्रयत्न करेल, त्याला सर्वप्रथम नरेंद्र मोदीचा सामना करावा लागेल," असेही मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या या विधानावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया देत, "भारताच्या पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरसंदर्भात जी खोटी आणि दिशाभूल करणारी विधाने केली आहेत, ती पाकिस्तान पूर्णपणे फेटाळतो," असे म्हटले आहे.

पहलगाम हल्ल्यासंदर्भात काय म्हणाला पाकिस्तान? -
पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, "अशी विधाने म्हणजे जगाचे लक्ष खऱ्या मुद्द्यांपासून भरकटवण्याचा प्रयत्न आहे. विशेषतः अशा भागात, जेथे लोकांसोबत योग्य  व्यवहार केला जात नाही. तसेच, भारतीय पंतप्रधानांनी पुन्हा एकदा कुठल्याही पुराव्यांशिवाय, पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानला दोषी ठहरवले, यांचेही आम्हाला दुःख आहे."

पाकिस्तानने पुन्हा उपस्थित केला जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा -
पाकिस्तानने पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. "जम्मू आणि काश्मीर हा आंतरराष्ट्रीय वादग्रस्त भाग आहे. याचा अंतिम निकाल संयुक्त राष्ट्रांचा निर्णय आणि काश्मिरातील जनतेच्या इच्छेने लागेल. कोणताही दावा किंवा विधान हे सत्य बदलू शकत नाही. जेव्हा जम्मू काश्मिरात मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले जात आहे, लोकांचे स्वातंत्र्य हिरावले जात आहे, विनाकारण अटक केली जात आहे, जे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन आहे. असे असताना भारतव्याप्त काश्मीरमध्ये (IOJK) होत असलेली विकासाची चर्चा खोटी वाटते." याशिवाय, "काश्मिरी लोकांचे हक्क आणि प्रतिष्ठेच्या लढाईत आम्ही नेहमीच त्यांच्यासोबत उभे राहू," असेही पाकिस्तानने म्हटले आहे.
 

Web Title: Prime Minister Modi gifts Chenab Bridge and Vande Bharat Train to Kashmir pakistan reaction on pm modi speech in jammu kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.