आव्हानाची भाषा करणाऱ्या पाकिस्तानचा सूर बदलला! आता विनवणी करत म्हणतायत "दोन्ही देशांच्या..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 13:46 IST2025-06-04T13:45:31+5:302025-06-04T13:46:02+5:30
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यानंतर आता पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताशी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आव्हानाची भाषा करणाऱ्या पाकिस्तानचा सूर बदलला! आता विनवणी करत म्हणतायत "दोन्ही देशांच्या..."
भारतीय हवाई दलाच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मधील दणदणीत कारवाईनंतर पाकिस्तानच्या नेतृत्वात आता शांततेचा सूर उमटू लागला आहे. नेहमीच आव्हानाची भाषा करणाऱ्या पाकिस्तानने आता आपले सूर बदलले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यानंतर आता पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताशी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भुट्टो यांनी भारताच्या ‘रॉ’ आणि पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ या गुप्तचर संस्थांमध्ये थेट संवाद घडवण्याची शिफारस केली आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या एका ब्रीफिंगमध्ये बोलताना बिलावल भुट्टो म्हणाले की, "पाकिस्तान अजूनही भारतासोबत दहशतवादाविरोधातील लढ्यात सहकार्य करू इच्छितो. आपल्याला अब्जावधी लोकांचे भविष्य दहशतवादी गटांच्या हातात देऊन चालणार नाही."
रॉ आणि आयएसआय एकत्र आले तर...
बिलावल भुट्टो यांनी स्पष्टपणे म्हटले की, रॉ आणि आयएसआय जर एकत्र आले, तर भारत आणि पाकिस्तानमधील दहशतवादाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. त्यांचे हे वक्तव्य पाकिस्तानच्या आतल्या असुरक्षिततेचा आणि ऑपरेशन सिंदूरच्या तडाख्याचा परिणाम मानले जात आहे.
शाहबाज शरीफ यांचीही चर्चा करण्याची तयारी
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही अलीकडेच अझरबैजानमध्ये झालेल्या तुर्की-पाकिस्तान-अझरबैजान त्रिपक्षीय परिषदेत भारताशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली. त्यांनी म्हटले की, "काश्मीर, पाणी आणि दहशतवाद यासारखे सर्व प्रश्न दोन्ही देशांनी शांततेने आणि एकत्र बसून सोडवले पाहिजेत." याआधी, तेहरानमध्ये दिलेल्या विधानातही शरीफ यांनी भारताशी सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला मोठा धक्का
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची ६ लढाऊ विमाने, २ हाय व्हॅल्यू फायटर जेट, १० यूसीएव्ही, १ सी-१३० मालवाहू विमान, तसेच अनेक क्रूझ क्षेपणास्त्रे नष्ट केली. यामुळे पाकिस्तानची लष्करी ताकद आणि मनोबल दोन्ही मोठ्या प्रमाणात हादरले आहे.