२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 12:52 IST2026-04-05T12:45:34+5:302026-04-05T12:52:47+5:30
ही एक सॉलिड फ्यूल असलेली मिसाइल असून ते रस्त्यावर बसवलेल्या ट्रान्सपोर्टर इरेक्टर लाँचर (TEL) मधून प्रक्षेपित केली जाऊ शकते.

२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
इस्लामाबाद - पाकिस्तानने नुकतेच कोलकाता येथे हल्ल्याची धमकी दिली आहे जे पाकिस्तानपासून जवळपास २ हजार किमी दूर आहे. सियालकोट येथे पत्रकारांशी बोलताना पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे. सियालकोट ते कोलकाता याचे हवाई अंतर १६०० ते १७०० किमी इतके आहे तर रस्ते मार्गाने हे अंतर २ हजार किमी पेक्षा जास्त आहे.
पाकिस्तानचा दावा आहे की, त्यांच्याकडे आता इतक्या लांब पल्ल्याची मिसाइल आहे जी सहजपणे कोलकातापर्यंत पोहचू शकते. पाकिस्ताननं ही धमकी त्यांच्या शाहीन ३ मिसाइलच्या आधारे दिली आहे. ही मिसाइल पाकिस्तानच्या रणनीती शक्तीचे सर्वात मोठे शस्त्र मानले जाते. शाहीन-३ हे पाकिस्तानचे सर्वाधिक पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असून त्याची रेंज २,७५० किलोमीटर आहे. याची पहिली चाचणी २०१५ मध्ये घेण्यात आली होती आणि आता ते पूर्णपणे कार्यान्वित आहे. ही एक सॉलिड फ्यूल असलेली मिसाइल असून ते रस्त्यावर बसवलेल्या ट्रान्सपोर्टर इरेक्टर लाँचर (TEL) मधून प्रक्षेपित केली जाऊ शकते.
त्यात पारंपरिक आणि आण्विक दोन्ही प्रकारची युद्धसामग्री वाहून नेऊ शकते. याचा वेग प्रचंड आहे आणि ते संपूर्ण भारतीय मुख्य भूभाग व्यापू शकते. कोलकाता, दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, अगदी अंदमान आणि निकोबार बेटेसुद्धा त्याच्या टप्प्यात येतात. शाहीन-III चा मुख्य उद्देश भारताला सामरिकदृष्ट्या रोखणे हा आहे. शाहीन-३ याशिवाय पाकिस्तानकडे भारताच्या वेगवेगळ्या भागांना लक्ष्य करू शकणारी इतरही अनेक क्षेपणास्त्रे आहेत. शाहीन २ याची रेंज १८०० किमी इतकी आहे. २००४ पासून ती कार्यान्वित आहे. कोलकाता, दिल्ली, लखनौ आणि उत्तर भारतातील अनेक बड्या शहरे त्या कक्षेत येतात. शाहीन १ मिसाइलची रेंज ७५० किमी आहे. जी पंजाब आणि राजस्थानच्या अनेक शहरांना सहजपणे टार्गेट करू शकते.
अबाबिल मिसाइल ही शाहीन-III ची MIRV (मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेइकल) व्हर्जन आहे. याची रेंज अंदाजे २,२०० किलोमीटर आहे. MIRV तंत्रज्ञानामुळे एकाच क्षेपणास्त्राला अनेक स्फोटके वाहून नेता येतात, ज्यामुळे एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर मारा करता येतो. सध्या याची चाचणी सुरू आहे. पाकिस्तान याला आपले सर्वात घातक शस्त्र म्हणून विकसित करत आहे. गौरी मिसाइलची रेंज १५०० किमी आहे. ती लिक्विड फ्यूल असलेली मिसाइल आहे. १९९० च्या दशकात ती पाकिस्तानजवळ होती. बाबुर क्रूझ मिसाइल ही एक ग्राऊंड लॉन्च क्रूझ मिसाइल आहे. त्याची रेंज ७०० ते १ हजार किमीपर्यंत आहे. कमी उंचीवरून ती उडू शकते ज्यामुळे रडारमध्ये ती येणे कठीण होते. पाकिस्तानकडे शाहीन ३ आणि अबाबिल मिसाइलसारख्या मिसाइल पूर्व भारत आणि दक्षिण भारताला टार्गेट करू शकतात.
पाकिस्तानच्या धमकीचा भारतावर काय परिणाम?
पाकिस्ताननं दिलेली धमकी गंभीर यासाठी आहे कारण शाहीन ३ या मिसाइलची रेंज २७५० किमी आहे जे कोलकात्याहून खूप जास्त आहे. पाकिस्तान या क्षेपणास्त्रांचा वापर प्रामुख्याने प्रतिबंधासाठी करतो असं तज्ज्ञ सांगतात. परंतु भारताकडेही यापेक्षा अधिक घातक मिसाइल आहेत. ज्यात अग्नी ५ मिसाइलची रेंज ७००० किमी आहे. त्याशिवाय भारताकडे एअर डिफेन्स सिस्टम मल्टी लेयर्ड आहेत जी पाकिस्तानी मिसाइल लॉन्च होताच त्यांच्याच परिसरात उद्ध्वस्त करू शकतात.