युद्ध झालं तर मंदिरांमधला घंटानाद बंद होईल; पाकिस्तानच्या मंत्र्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 19:55 IST2019-02-19T19:48:48+5:302019-02-19T19:55:26+5:30

इम्रान खान यांच्या भाषणानंतर पाकिस्तानच्या मंत्र्याची भारताला धमकी

Pakistan rail minister rashid ahmed attempts to talk tough threatens to blind India | युद्ध झालं तर मंदिरांमधला घंटानाद बंद होईल; पाकिस्तानच्या मंत्र्याची धमकी

युद्ध झालं तर मंदिरांमधला घंटानाद बंद होईल; पाकिस्तानच्या मंत्र्याची धमकी

इस्लामाबाद: पुलवामा हल्ल्याच्या 5 दिवसांनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जनतेशी संवाद साधला. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात नाही. कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय भारताकडून पाकिस्तानवर आरोप केले जात असल्याचा दावा त्यांनी भाषणात केला. हल्ल्याचे पुरावे द्या, चौकशीला सहकार्य करतो, असंदेखील इम्रान म्हणाले. भारतानं आक्रमण केल्यास पाकिस्तानदेखील चोख प्रत्युत्तर देईल, अशा इशारादेखील खान यांनी दिला. यानंतर आता खान यांचे मंत्रीदेखील भारताविरोधात आगलावी भाषणं करु लागले आहेत. 

भारतानं शांततेची बोलणी केली, तर आम्हीदेखील शांततेविषयी बोलू. मात्र त्यांनी युद्धाची भाषा केली, तर आम्हीदेखील त्याच भाषेत उत्तर देऊ, असं पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद म्हणाले. इम्रान खान यांनी 20 कोटी पाकिस्तानी जनतेच्या वतीनं भाषण केलं. पाकिस्ताननं हातात बांगड्या घातलेल्या नाहीत, हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. आमच्यासाठी पाकिस्तान म्हणजे जीवन आहे आणि पाकिस्तान म्हणजेच मरण आहे. पाकिस्तानकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं, तर त्याचे डोळे काढून घेऊ, अशी धमकी त्यांनी दिली. 




युद्धाची भाषा केल्यास आम्ही त्याच पद्धतीनं उत्तर देऊ. मग ना कधी गवत उगवेल, ना चिमण्यांचा चिवचिवाट होईल आणि ना मंदिरात कधी घंटानाद होईल, अशा शब्दांमध्ये अहमद यांनी भारताला धमकी दिली. पाकिस्तान मुस्लिमांचा किल्ला आहे आणि आज साऱ्या जगातील मुस्लिमांचं लक्ष पाकिस्तानकडे आहे, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं. पाकिस्तानची 20 कोटी जनता इम्रान खान यांच्यासोबत आहे. युद्ध असो वा शांतता, देशातील जनता खान यांच्यासोबत आहे, असं ते म्हणाले. 

Web Title: Pakistan rail minister rashid ahmed attempts to talk tough threatens to blind India