पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्य दलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळेपाकिस्तानवर मोठी नामुष्की ओढवली होती. या मोहीमेच्या सुरुवातीला भारतानेपाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. तर नंतर पाकिस्तानच्या प्रमुख हवाई तळांना लक्ष्य केले होते. त्यामुळे पाकिस्तानला हतबल होऊन युद्धविरामासाठी विनवणी करावी लागली होती. मात्र या जबरदस्त नामुष्कीनंतरही पाकिस्तान सुधरण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाही आहेत. आता पाकिस्तानने भारतासमोर आव्हान उभं करण्यासाठी अण्वस्त्रांबाबत भयंकर डाव आखण्याच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे.
अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या गोपनीय अहवालानुसार पाकिस्तान त्याच्याकडील अण्वस्त्रांच्या साठ्याचं वेगाने आधुनिकीकरण करत आहे. तसेच पाकिस्तान भारताला आपल्या अस्तित्वासाठी मोठा धोका मानत आहे. ही रणनीती पाकिस्तानची लष्करी विचारसणी आणि सीमेवरील त्यांच्या आक्रमकतेला दर्शवत आहे. या रिपोर्टमधील उल्लेखानुसार पाकिस्तान मुख्यत्वेकडून चीनकडून मिळणाऱ्या आर्थिक आणि लष्करी मदतीवर अवलंबून आहे. चीनकडून मिळणारी साधनसामुग्री आणि तांत्रिक मदतीच्या आदारावर पाकिस्तान आपल्या लष्करी सामर्थ्यासोबतच आण्विक ताकदीचाही विस्तार करत आहे.
तज्ज्ञांच्या मते, चीन आणि पाकिस्तानमधील ही आघाडी भारतासाठी सामरिकदृष्ट्या दुहेरी संकट निर्माण करत आहे. एकीकडे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनकडून येत असलेला दबाव आणि दुसरीकडे पाकिस्तानचा आण्विक ताकद वाढवण्याचा आणि सीमेपलीकडून अस्थिरता निर्माण करण्याचा डाव भारताचं टेन्शन वाढवणारा आहे.