भारतानं शांततेपेक्षा राजकारणाला दिलं महत्त्व, पाकिस्तानच्या उलट्या बोंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 08:57 IST2018-09-30T08:31:12+5:302018-09-30T08:57:09+5:30

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत फटकारल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे.

pakistan foreign minister mahmood qureshi raised kashmir dispute at united nations general assembly | भारतानं शांततेपेक्षा राजकारणाला दिलं महत्त्व, पाकिस्तानच्या उलट्या बोंबा

भारतानं शांततेपेक्षा राजकारणाला दिलं महत्त्व, पाकिस्तानच्या उलट्या बोंबा

न्यू यॉर्क - परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत दहशतवादाच्या मुद्यावरुन फटकारल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. शांततेसाठी चर्चा करण्याऐवजी भारत राजकारणाला पसंती देत असल्याच्या उलट्या बोंबा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी मारल्या आहे. शिवाय, त्यांनी काश्मीरचा मुद्दादेखील यावेळी उपस्थित केला. ''काश्मीरचा मुद्दा हा गेल्या 70 वर्षांपासून प्रलंबित आहे आणि या न सुटलेल्या वादामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात अडचणी निर्माण होत आहेत'', असे कुरैशी यांनी म्हटले. 

पुढे ते असंही म्हणाले की, ''भारतानं आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. भारतानं हल्ला करण्याची चूक केली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. आम्ही पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणार नाही'', असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचा खरा चेहरा दाखवून दिला आहे. 

भारतावर केले अनेक आरोप 
पाकिस्तान भारतासोबत सर्व मुद्यांवर चर्चा करण्यास इच्छुक होता, मात्र भारतानं शांततेऐवजी राजकारणाला प्राधान्य देत चर्चा रद्द केली. काही महिन्यांपूर्वी जारी करण्यात आलेल्या पोस्टाच्या तिकिटांचा त्यांना बहाणा पुढे केला. दीर्घ प्रलंबित समस्यांचे निराकरण करण्यासाठी संवाद हा एकमेव मार्ग आहे आणि त्यांनी क्षेत्रास आपली वास्तविक क्षमता प्रत्यक्षात आणण्यापासून रोखले आहे. सुषमा स्वराज यांनी चर्चा रद्द केल्यानंतर तिळपापड झालेल्या पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी असेही म्हटले की, भारत-पाकिस्तानदरम्यान होणारी ही बैठक विभिन्न मुद्यांवर संवाद साधण्यासाठी एक चांगली संधी असू शकली असती, मात्र वृत्तीमुळे भारताने तिसऱ्यांदा ही संधी गमावली आहे.' 

सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला फटकारलं

दरम्यान, संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये सुषमा स्वराज यांनी दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानच्या भूमिकेवर सडकून टीका केली. ''पाकिस्तान हा असा शेजारी देश आहे, की ज्याने दहशतवाद पसरवण्याबरोबरच त्याला नाकारण्याचेही कसब मिळवले आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी नंदनवन असून 26/11 च्या हल्ल्यातील मास्टरमाईंड उघड माथ्याने हिंडत आहे'', असा शब्दांत स्वराज यांनी पाकिस्तानला फटकारलं. 

9/11 चा न्यू-यॉर्कवरील हल्ला  आणि 26/11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांनी शांततेच्या प्रयत्नांना खीळ घातली आहे. भारत दहशवादामुळे त्रस्त असून शेजारील देशच याला खतपाणी घालत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. प्रत्येक वेळी पाकिस्तानच्या कृत्यांमुळे शांततेसाठीची चर्चा रद्द करण्यात आली आहे. पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतासमोर चर्चेसाठी प्रस्ताव ठेवला होता. भारतही तयार होता. मात्र, पाकिस्तानने भारताच्या तीन जवानांचे अपहरण करुन एकाची हत्या केली. यामुळे, चर्चेसाठी भारताने पाकिस्तानला नकार दिल्याचे सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले. 



 

Web Title: pakistan foreign minister mahmood qureshi raised kashmir dispute at united nations general assembly