"तर आम्ही कुठल्याही थराला जाऊ"; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या असीम मुनीरचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:43 IST2026-01-01T13:42:31+5:302026-01-01T13:43:34+5:30
Asim Munir, India vs Pakistan: बलुचिस्तानमधील हिंसाचारालाही भारताचे समर्थन असल्याचा पाकिस्तानचा आरोप

"तर आम्ही कुठल्याही थराला जाऊ"; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या असीम मुनीरचा इशारा
Asim Munir, India vs Pakistan: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पाकिस्तानने आक्रमक आणि चिथावणीखोर भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे. भारताचे नाव न घेता, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी इशारा दिला की, पाकिस्तानच्या प्रादेशिक अखंडतेचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उल्लंघन करण्याचा प्रयत्न केल्यास सडेतोड आणि चोख प्रत्युत्तर दिले जाईल. महत्त्वाची बाब म्हणजे, हे विधान अशा वेळी आले, जेव्हा पाकिस्तान स्वतः अंतर्गत अशांतता आणि दहशतवादाच्या गंभीर समस्येशी झुंजत आहे.
पाकिस्तानी लष्कराने जारी केलेल्या निवेदनानुसार, जनरल असीम मुनीर यांनी रावळपिंडी येथील जनरल मुख्यालय (GHQ) येथे आयोजित बलुचिस्तानवरील १८व्या राष्ट्रीय कार्यशाळेतील सहभागींना संबोधित करताना हे विधान केले. त्यांनी सांगितले की पाकिस्तान आपले सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही थराला जाईल. पाकिस्तानच्या प्रादेशिक अखंडतेचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उल्लंघन केल्यास त्याला सणसणीत उत्तर दिला जाईल.
असीम मुनीर यांनी कोणताही पुरावा न देता 'भारत समर्थित गट' बलुचिस्तानमध्ये हिंसाचार पसरवण्यात आणि विकासकामात व्यत्यय आणण्यात गुंतलेले असल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले की सुरक्षा दल दहशतवाद आणि अशांततेपासून प्रांत मुक्त करण्यासाठी कठोर कारवाई करत राहील.
पाकिस्तानच्या या वक्तव्यादरम्यान, भारतातील पंजाबचे पोलिस महासंचालक (डीजीपी) गौरव यादव यांनी एक गंभीर आरोप केला आहे, ज्यामुळे पाकिस्तानचे खरे स्वरूप उघड झाले आहे. ते म्हणाले की पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय ड्रोनद्वारे पंजाबमध्ये शस्त्रे आणि दारूगोळा पाठवत आहे. बुधवारी पत्रकार परिषदेत डीजीपी यादव म्हणाले की, ग्रेनेड हल्ल्यासारख्या घटनांना प्रोत्साहन देऊन पाकिस्तान पंजाबला 'अत्यंत अशांत' राज्य म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. हा भारताविरुद्ध छेडलेल्या प्रॉक्सी युद्धाचा भाग असल्याचे वर्णनही त्यांनी केले आहे.