तुम्हालाही याचा त्रास होणार..; लादेनचा उल्लेख करत जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांना फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 17:24 IST2025-06-11T17:24:25+5:302025-06-11T17:24:50+5:30
Pahalgam Terror Attack: भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ब्रुसेल्समध्ये दहशतवादाबद्दल भारताची भूमिका स्पष्ट केली.

तुम्हालाही याचा त्रास होणार..; लादेनचा उल्लेख करत जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांना फटकारले
Pahalgam Terror Attack: भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ब्रुसेल्स दौऱ्यात युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आणि ईयूच्या परराष्ट्र व्यवहार प्रमुख काजा कल्लास यांची भेट घेतली. यादरम्यान, त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केल्याबद्दल आणि दहशतवादाविरुद्ध लढण्यात एकता दाखवल्याबद्दल उर्सुला वॉन डेर लेयन यांचे कौतुक केले. तसेच, भारताचे धोरणात्मक महत्त्व, जागतिक स्थिती अधोरेखित करण्यासोबतच युरोपियन युनियनच्या प्रमुख धोरणांवर आक्षेप व्यक्त केला.
दहशतवादाचा तुम्हालाही त्रास...
जयशंकर यांनी दहशतवादाचा उल्लेख करत म्हटले की, मी तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून देऊ इच्छितो की, ओसामा बिन लादेन नावाचा दहशतवादी पाकिस्तानात सुरक्षित होता. जगाने हे समजून घ्यावे की, हा केवळ भारत-पाकिस्तानचा मुद्दा नाही. आम्हाला ठामपणे वाटते की, दहशतवादाला झिरो टॉलरन्स असले पाहिजे. याबाबत आपण कधीही आण्विक ब्लॅकमेलला बळी पडू नये. हे जगासमोरील एक मोठे आव्हान आहे. या विषयावर मजबूत आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि समज असणे अत्यावश्यक आहे. हा दहशतवादाचा मुद्दा आहे, शेवटी याचा तुम्हालाही त्रास होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
Watch: EAM S. Jaishankar says, "We strongly believe that there must be zero tolerance for terrorism in all its forms and manifestations. In that context, it is also essential that we never yield to nuclear blackmail. This is a shared and interconnected challenge for the global… pic.twitter.com/UJpOOyqzof
— IANS (@ians_india) June 10, 2025
भारत एक विश्वासार्ह आर्थिक भागीदार
युरोपीय युनियन आणि भारत मुक्त व्यापार करारावर सुरू असलेल्या वाटाघाटींबाबत बोलताना जयशंकर यांनी भारताला एक विश्वासार्ह आर्थिक भागीदार म्हटले. १.४ अब्ज लोकसंख्या असलेला भारत चीनपेक्षा कुशल कामगार आणि अधिक विश्वासार्ह आर्थिक भागीदारी देतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
रशिया-युक्रेन युद्धावर भाष्य
रशिया-युक्रेन युद्धावर भारताच्या भूमिकेबद्दल बोलताना जयशंकर म्हणाले, युद्धाद्वारे मतभेद सोडवता येतात, असे आम्हाला वाटत नाही. युद्धभूमीतून कोणताही तोडगा निघू शकत नाही. आम्ही निर्देशक किंवा निर्णायक नाही, पण आम्ही त्यात सहभागीही नाही. रशियाविरुद्धच्या निर्बंधांमध्ये सामील होण्यास भारताने नकार दिल्याबद्दल होत असलेल्या टीकेला उत्तर देताना जयशंकर म्हणाले, युक्रेनशी आमचेही मजबूत संबंध आहेत. पण, प्रत्येक देश स्वाभाविकपणे स्वतःचा अनुभव, इतिहास आणि हितसंबंध विचारात घेतो.