केवळ आयएसआयच दहशतवादी हल्ले रोखू शकतो; बिलावल भुट्टोंनी युएनमध्येच भारताचे आरोप केले मान्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 18:46 IST2025-06-04T18:45:52+5:302025-06-04T18:46:21+5:30
Operation Sindoor: पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांना अमेरिकेत एका पत्रकाराने भारत मुस्लिम विरोधी अजेंडा राबवत असल्याच्या आरोपांवर तोंडघशी पाडले होते. याला काही तास उलटत नाही तोच भुट्टो यांनी पाकिस्तानला अडचणीत आणणारे वक्तव्य केले आहे.

केवळ आयएसआयच दहशतवादी हल्ले रोखू शकतो; बिलावल भुट्टोंनी युएनमध्येच भारताचे आरोप केले मान्य
पाकिस्तान एक दहशतवादी राष्ट्र असल्याचे जगभरात भारत सांगत आहे. पहलगाम हल्ला व त्याला प्रत्यूत्तर म्हणून राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरवर भारताने एवढी वातावरण निर्मिती केली आहे की आता पाकिस्तान काही केल्या आपली प्रतिमा बदलू शकत नाही. अशातच भारताच्या या खेळीला प्रत्यूत्तर देण्यासाठी पाकिस्ताननेही आपली टीम पाकिस्तानची बाजू मांडण्यासाठी तसेच भारताला बदनाम करण्यासाठी पाठविली होती. परंतू, ही टीमच आता तोंडघशी पडू लागली आहे.
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांना अमेरिकेत एका पत्रकाराने भारत मुस्लिम विरोधी अजेंडा राबवत असल्याच्या आरोपांवर तोंडघशी पाडले होते. याला काही तास उलटत नाही तोच भुट्टो यांनी पाकिस्तानला अडचणीत आणणारे वक्तव्य केले आहे.
संयुक्त राष्ट्रांत भुट्टो यांनी भारतातील दहशतवादी हल्ले केवळ आयएसआयच रोखू शकतो, यासाठी भारतीय यंत्रणांना आयएसआयशी बोलावे लागेल, असे म्हटले आहे. एकप्रकारे भुट्टो यांनी पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयच दहशतवादी हल्ले करवत असल्याचे कबुल केले आहे. भारताला आमच्या आयएसआयसोबत बसून चर्चा केल्याशिवाय दहशतवाद संपविण्याबाबत कोणताही पर्याय नसल्याचे ते म्हणाले आहेत.
आयएसआयवर प्रॉक्सी दहशतवादी संघटना निर्माण करण्याचा आणि काश्मीर आणि देशाच्या इतर भागात दहशतवादी पाठवण्याचा आरोप भारत सातत्याने करत आला आहे. जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या संघटनांना आयएसआयच पोसत आली आहे. भुट्टो हे पाकिस्तानी खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. यामुळे त्यांच्या या वक्तव्याला महत्व आले आहे. बिलावल सिंधू नदीच्या पाण्याच्या मुद्द्यावर जगभरातील देशांकडून मदत मागत आहेत. पाकिस्तानने आपण अमेरिकेसाठी दहशतवादी तयार केल्याचे देखील कबुल केले होते.