ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 20:43 IST2025-06-19T20:43:02+5:302025-06-19T20:43:29+5:30

भारत सरकारने इस्रायलमध्ये असलेल्या आणि मायदेशी परत येऊ इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांना परत आणण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Operation Sindhu: Indian government to bring back Indians from Israel! How to register? Find out | ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या

ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या

इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने इस्रायलमध्ये असलेल्या आणि मायदेशी परत येऊ इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांना परत आणण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी एक पोस्ट करत ही माहिती दिली.

मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, "इस्रायल आणि इराणमधील सध्याच्या घडामोडी पाहता, भारत सरकारने इस्रायलमधून परत येऊ इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्याची व्यवस्था केली आहे. त्यांना इस्रायलमधून भूमार्गाने प्रवास करून सीमेपर्यंत आणले जाईल आणि त्यानंतर विमानाने भारतात पोहोचवले जाईल."

तात्काळ नोंदणी करा!
इस्रायलमधून परत येण्यास इच्छुक असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना तेल अवीवमधील भारतीय दूतावासाकडे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांनी अद्याप नोंदणी केली नाही, त्यांनी https://www.indembassyisrael.gov.in/indian_national_reg या लिंकवर जाऊन लगेच नोंदणी करावी. तसेच, कोणत्याही मदतीसाठी, तेल अवीवमधील भारतीय दूतावासाच्या २४/७ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येणार आहे. यासाठी देखील माहिती जारी करण्यात आली आहे.

दूरध्वनी क्रमांक: +972 54-7520711, +972 54-3278392
ईमेल: cons1.telaviv@mea.gov.in

सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य
भारत सरकार परदेशातील आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. "सरकार परिस्थितीवर सतत बारकाईने लक्ष ठेवून आहे. दूतावास तेथील भारतीय समुदायाच्या संपर्कात असून, सर्वतोपरी मदत देण्यासाठी कटिबद्ध आहे," असे मंत्रालयाने सांगितले.

यापूर्वी, इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणमधून भारतीयांना परत आणण्यासाठी सुरू केलेल्या 'ऑपरेशन सिंधू' अंतर्गत पहिले विमान येरेव्हान, आर्मेनिया येथून ११० भारतीय नागरिकांना घेऊन गुरुवारी दिल्लीत दाखल झाले आहे.

Web Title: Operation Sindhu: Indian government to bring back Indians from Israel! How to register? Find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.