काश्मीरप्रश्न सुटला तर अण्वस्त्रांची गरज भासणार नाही; पाक पंतप्रधान इम्रान खान यांचं विधान, अमेरिकेलाही घातली गळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 13:08 IST2021-06-22T13:07:46+5:302021-06-22T13:08:47+5:30
पाकिस्तान अणुशस्त्रांबाबतीत पूर्णपणे सज्ज असून देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक शस्त्रसाठा उपलब्ध आहे आणि काश्मीरप्रश्न सुटला तर अणुशस्त्रांची गरजच भासणार नाही

काश्मीरप्रश्न सुटला तर अण्वस्त्रांची गरज भासणार नाही; पाक पंतप्रधान इम्रान खान यांचं विधान, अमेरिकेलाही घातली गळ
पाकिस्तान अणुशस्त्रांबाबतीत पूर्णपणे सज्ज असून देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक शस्त्रसाठा उपलब्ध आहे आणि काश्मीरप्रश्न सुटला तर अणुशस्त्रांची गरजच भासणार नाही, असं विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं आहे. यासोबत अमेरिकेची जर इच्छा आणि संकल्प केला तर काश्मीरप्रश्न नक्कीच सुटू शकतो, अशी गळही इम्रान खान यांनी अमेरिकेला घातली आहे.
पाकिस्तानच्या शस्त्रसाठ्यात सध्या १६५ अण्वस्त्र असल्याची माहिती समोर आली आहे. यात आणखी वाढ करण्याचा मनसुबा पाकिस्तानचा आहे. स्टॉकहोल्म आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थेनं (एसआयपीआरआय) यासंबंधीची माहिती जाहीर केली आहे.
"देशाचं संरक्षण करण्यासाठी पुरेशी अण्वस्त्र सज्ज आहेत. माझ्या माहितीनुसार ही एक आक्षेपार्ह गोष्ट नाही. शेजारील देशाच्या आकारापेक्षा सातपट असलेल्या कोणत्याही देशाला याबाबत काळजी बाळगावी लागेल इतका शस्त्रसाठा आमच्याकडे आहे. ज्या दिवशी काश्मीरचा प्रश्न सुटेल त्यादिवशी कोणत्याही अण्वस्त्रांची गरज भासणार नाही", असं इम्रान खान म्हणाले. यासोबतच जर अमेरिकन लोकांनी इच्छाशक्ती आणि संकल्प केला तर काश्मीरप्रश्न नक्की सुटू शकतो, असंही ते म्हणाले. दरम्यान, काश्मीरप्रश्नात इतर कोणत्याही देशानं हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याची भूमिका वांरवार मांडली आहे.