गुंतवणूक आणण्यासाठी दावोस का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दूर केली ‘शंका’; विरोधकांची घेतली ‘शाळा’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 19:53 IST2025-01-23T19:50:17+5:302025-01-23T19:53:54+5:30
Maharashtra CM Devendra Fadnavis PC From Davos: एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुंतवणूक येत आहे, याबाबत काहींना असूया आहे. त्यांना त्यांच्या काळात जे जमले नाही, ते आम्ही करून दाखवत आहोत, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

गुंतवणूक आणण्यासाठी दावोस का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दूर केली ‘शंका’; विरोधकांची घेतली ‘शाळा’
Maharashtra CM Devendra Fadnavis PC From Davos: गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस येथे आहेत. महाराष्ट्रासाठी आतापर्यंत सर्वाधिक गुंतवणूक दावोसमधून आल्याचे सांगितले जात आहे. याबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट दावोस येथून सविस्तर माहिती दिली. दावोस येथून संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करताना विरोधकांनाही स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्राने वर्ल्ड इकोनॉमी फोरमध्ये ६१ करार केले. त्यात १५ लाख ७० हजार कोटींची गुंतवणूक राज्यात आली. १६ लाख रोजगार निर्मिती होणार आहे. इन्फ्रास्क्ट्रक्चर, ग्रीन एनर्जी, सोलार, फायनान्स, लॉजेस्टिक, इंटरटेनमेंट, आयटी, स्टील, डेटा सेंटर, शिक्षण, संरक्षण, ऑटो, इलेक्ट्रिक, ड्रोन मॅन्युफॅक्चरिंगसह अनेक क्षेत्रातील करार करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सर्वच भागात ही गुंतवणूक येणार आहे. MMR विभागात जवळपास ६ लाख कोंटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
गुंतवणूक आणण्यासाठी दावोस का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दूर केली ‘शंका’
महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी दावोसचीच का निवड केली जाते, याबाबत विरोधकांनी शंका उपस्थित केली होती. याला शंकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. दावोस हे जागतिक नेटवर्किंगचे केंद्र आहे. जगभरातील सीईओ वर्ल्ड इकोनॉमी फोरमनिमित्त इथे असतात. ज्या काही भारतीय कंपन्यांसोबत आपण करार केलेत, त्यांची इच्छा असते आमचे जे फॉरेन पार्टनर आहेत ते आपल्या करारावेळी उपस्थित असले पाहिजेत, त्यांच्यासोबत तुमची चर्चा झाली पाहिजे. इतक्या मोठ्या प्रमाणात सगळे एकत्र दावोसला येतात. त्यामुळे हे करार दावोसमध्ये होतात. मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणून आपली ताकद दाखवतो. नेटवर्किंक फोरममधून सगळे एकमेकांना भेटतात. गुंतवणूकदार एकत्र येतात त्यामुळे दावोस हे केंद्र म्हणून पुढे येत आहे. भारताची आणि महाराष्ट्राची जी क्षमता वाढते त्याचे द्योतक हे करार आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावरून विरोधकांनी टीका केली. यावर बोलताना, महाराष्ट्राला १५ लाख ७० हजार कोटींची गुंतवणूक मिळाल्यानंतर काही लोकांना आनंद होत नसेल तर त्याचा इलाज नाही. आपण जे काही करत आहोत, ते महाराष्ट्रासाठी करत आहोत. ज्यांनी वेगवेगळे ट्विट्स केले त्यांना फार उत्तर द्यायची गरज नाही. इतक्या मोठ्या संख्येने महाराष्ट्रात गुंतवणूक येत आहे, त्याचा आनंद आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीसांनी दावोस दौऱ्यावरून टीका करणाऱ्या विरोधकांना टोला लगावला. ज्यांना केवळ नकारात्मक दृष्टीने याकडे पाहायचे आहे, ते अशी टीका करतील. मूळात ही असूया आहे. त्यांना त्यांच्या काळात जे जमले नाही, ते आम्ही करून दाखवत आहोत. आपण ग्लोबलाइज जगात आहोत. आपली जेएसडब्ल्यू सारखी कंपनी आहे. ही कंपनी भारतीय असली तरी ती जागतिक स्तरावर काम करत आहे. एमजीसारखी कंपनी त्यांनी घेतली आहे. टाटा हीदेखील ग्लोबल कंपनी आहे. त्यामुळे अशा कंपन्या त्यांच्या ग्लोबल पार्टनरसह आपल्याशी एमओयू करतात. मविआ काळात ५० हजार कोटींचेच करार झाले. महाराष्ट्रात एवढी मोठी गुंतवणूक येते, याचा राज्यातील जनतेला आनंद आहे, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, महाराष्ट्राच्या सगळ्याच क्षेत्रात MOU झालेत. देशभरात MOU प्रत्यक्षात अंमलबजावणी होणे, याचे प्रमाण ४० टक्के आहे. राज्यात ६०-६५ टक्के प्रमाण आहे. डेटा सेंटरमध्ये महाराष्ट्र कॅपिटल होत आहे. डेटा सेंटर कॅपिटल महाराष्ट्र झाल्याने खूप मोठ्या प्रमाणात राज्य पुढे जाणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.