या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:40 IST2025-06-17T16:39:42+5:302025-06-17T16:40:10+5:30
Israel Iran War: इराणने विमातळ बंद ठेवले आहेत. एअरस्पेसही बंद आहे. यामुळे आपल्या नागरिकांना आणण्यासाठी भारताची विमाने थेट इराणमध्ये जाऊ शकत नाहीत. इराणने दोन दिवसांपूर्वीच सीमा खुली असल्याचे नागरिकांना सांगितले होते.

या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
इस्रायलनेइराणवर जोरदार हल्ले सुरुच ठेवले आहेत. लष्करी ठिकाण्यांवर हल्ले होत असताना नागरिकही मारले जात आहेत. यामुळे सुमारे १५०० विद्यार्थ्यांसह १० हजार भारतीय नागरिक इस्रायलच्या हवाई हल्ल्यांखाली जीव मुठीत घेऊन मदतीची हाक देत आहेत. इराणमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, तसेच फोन लावला तर १५-१६ वेळा डायल करावा लागत आहे. अशातच इराणच्या शेजारील देश आर्मेनियाने भारताला मदतीचा हात दिला आहे.
इराणने विमातळ बंद ठेवले आहेत. एअरस्पेसही बंद आहे. यामुळे आपल्या नागरिकांना आणण्यासाठी भारताची विमाने थेट इराणमध्ये जाऊ शकत नाहीत. इराणने दोन दिवसांपूर्वीच सीमा खुली असल्याचे नागरिकांना सांगितले होते. यामुळे परदेशी नागरिकांबरोबरच स्थानिक इराणी नागरिकांनी देखील इराणबाहेर पलायन करण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपासून या प्रचंड वाहतुकीचे फोटो येत आहेत.
अशातच भारतीय विद्यार्थ्यांना इराणमधून बाहेर काढण्यासाठी भारताने इराणमधील आर्मेनियाच्या राजदुतांशी संपर्क साधला होता. कारण ११० विद्यार्थी सोमवारी आर्मेनियाच्या बॉर्डरवर पोहोचले होते. इराण सोडण्यापूर्वी, परदेशी नागरिकांना त्यांचे नाव, पासपोर्ट क्रमांक, वाहनांची माहिती, देशातून निघण्याची वेळ आणि त्यांना ओलांडायची असलेली सीमा राजनैतिक मिशनद्वारे इराणच्या जनरल प्रोटोकॉल विभागाला द्यावी लागणार आहे.
आर्मेनिया हा भारताचा चांगला मित्र देश आहे. अनेक संरक्षण करार उभयतांत झालेले आहेत. तसेच इराणची महत्वाची शहरे या देशापासून अत्यंत जवळ आहेत. इराणमधून भारतीयांना आर्मेनियात सहज प्रवेश दिला जाणार आहे. तिथून हे भारतीय येरेवन विमानतळावर येणार आहेत. या विमानतळावरून या लोकांना पु्हा भारतात आणले जाणार आहे. इराण आणि आर्मेनियामध्ये सध्या कोणताही सीमा वाद किंवा लष्करी तणाव नसल्याने भारतासाठी हे सोपे गेले आहे.
भारत-इराणच्या मध्ये पाकिस्तानही होता...
भारत आणि इराणच्या मध्ये पाकिस्तान देखील आहे. परंतू, भारताचे पाकिस्तानसोबत संबंध ताणलेले आहेत. गो इंडिगोच्या विमानाला पाकिस्तानने संकटकाळात येऊ दिले नव्हते, तर या भारतीयांना मदत करणे दूर राहिले. तसेच अफगाणिस्तान देखील यात आहे. अफगाणिस्तानसोबतही भारताचे चांगले संबंध आहेत. परंतू, इराण आणि अफगाणिस्तानमध्ये सीमा वाद आहे. यामुळे भारताने आर्मेनियाला निवडले आहे.