'दोन्ही आमचे मित्रच, पण..', इराण-इस्रायल युद्धावर भारताची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:06 IST2025-06-13T14:05:29+5:302025-06-13T14:06:06+5:30
Israel Attacks Iran: भारत सरकारने इराण-इस्रायल संघर्षावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

'दोन्ही आमचे मित्रच, पण..', इराण-इस्रायल युद्धावर भारताची पहिली प्रतिक्रिया
Israel Attack Iran:इस्रायलने इरामवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. दरम्यान, भारत सरकारने या वाढत्या संघर्षावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) शुक्रवारी (१३ जून २०२५) जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले की, आम्ही या परिस्थितीवर, विशेषतः अणु तळांवर हल्ल्यांशी संबंधित अहवालावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आम्ही दोन्ही देशांना तणाव वाढवणारी पावले टाळण्याचे आणि संवाद, राजनयिकतेद्वारे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, इस्रायल-इराण संघर्ष सुरू झाल्यानंतर इस्रायलमधील भारतीय दूतावासाने एक्सवर पोस्ट करत, इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला दिला होता. यासोबतच, कोणत्याही तातडीच्या कामाशिवाय बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली.
इराणमधील भारतीय दूतावासाचे आवाहन
इराणमधील भारतीय दूतावासानेही एका सूचनापत्रात म्हटले की, इराणमधील सध्याच्या परिस्थिती लक्षात घेता सर्व भारतीय नागरिकांना आणि भारतीय वंशाच्या लोकांना सतर्क राहण्याची, सर्व अनावश्यक क्रियाकलाप टाळण्याची, दूतावासाच्या सोशल मीडिया अकाउंटचे पालन करण्याची आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याची विनंती केली जाते.