दुबई बंदरात कुवेतच्या तेलवाहू जहाजावर इराणचा ड्रोन हल्ला! भीषण स्फोट, आगीचा भडका; तेल गळतीचे संकट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 12:47 IST2026-03-31T12:45:53+5:302026-03-31T12:47:12+5:30
Kuwait Dubai Oil Tanker Attack : इराणच्या हल्ल्यानंतर दुबई बंदराजवळ तेल गळतीचे संकट उभे राहिले आहे.

दुबई बंदरात कुवेतच्या तेलवाहू जहाजावर इराणचा ड्रोन हल्ला! भीषण स्फोट, आगीचा भडका; तेल गळतीचे संकट
अमेरिका-इराणयुद्धाने आता व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून, सोमवारी (३० मार्च २०२६) दुबईच्या बंदरात नांगरा टाकलेल्या कुवेतच्या 'अल साल्मी' या अवाढव्य तेलवाहू जहाजावर इराणने ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यामुळे जहाजाला भीषण आग लागली असून कच्च्या तेलाच्या गळतीमुळे समुद्रातील पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
काय आहे नेमकी घटना?
कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, हे जहाज २० लाख बॅरल कच्च्या तेलाने पूर्णपणे भरलेले होते आणि ते चीनच्या किंगदाओ बंदराकडे रवाना होणार होते. सोमवारी दुपारी दुबईच्या समुद्रात हे जहाज उभे असताना इराणच्या 'आत्मघाती' ड्रोनने त्याला थेट धडक दिली. स्फोट इतका भीषण होता की जहाजाच्या मुख्य भागाचे मोठे नुकसान झाले आणि आगीच्या ज्वाळा दूरवर दिसू लागल्या.
२४ कर्मचारी सुखरूप
दुबई प्रशासनाने तातडीने अग्निशमन दलाच्या बोटी पाठवून आगीवर नियंत्रण मिळवले आहे. जहाजावरील सर्व २४ कर्मचारी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.
होर्मुझ आणि दुबईत दहशतीचे वातावरण
२८ फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यापासून इराणने होर्मुझची सामुद्रधुनी आणि आखाती देशांतील व्यापारी मार्गांवर अनेक हल्ले केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच इशारा दिला होता की, जर इराणने तेलाचा पुरवठा रोखला, तर अमेरिका इराणचे ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त करेल. या ताज्या हल्ल्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा कडाडण्याची शक्यता आहे.
ऑक्सिजनची कमतरता आणि फूड चेन विस्कळीत
जेव्हा कच्चे तेल समुद्राच्या पाण्यावर पसरते, तेव्हा ते पृष्ठभागावर एक पातळ थर तयार करते. हा थर हवा आणि पाणी यांच्यातील संपर्क तोडतो, ज्यामुळे पाण्यात विरघळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. याचा थेट परिणाम मासे, डॉल्फिन आणि व्हेल माशांच्या श्वसनसंस्थेवर होतो. तसेच, सूर्याचा प्रकाश खोलवर पोहोचू न शकल्याने समुद्रातील वनस्पती आणि प्लँक्टन नष्ट होतात, ज्यामुळे संपूर्ण अन्नाची साखळी विस्कळीत होते.