भारतीय दूतावासावर हल्ला
By admin | Published: May 24, 2014 03:21 AM2014-05-24T03:21:19+5:302014-05-24T03:21:19+5:30
अफगाणिस्तानातील हेरत येथील भारताच्या वाणिज्य दूतावासावर शुक्रवारी चार सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला.
काबूल : अफगाणिस्तानातील हेरत येथील भारताच्या वाणिज्य दूतावासावर शुक्रवारी चार सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला. अफगाण सुरक्षा दलासमवेत नऊ तास चाललेल्या चकमकीत चारही हल्लेखोर ठार झाले आहेत. सर्व राजनैतिक कर्मचारी सुरक्षित असल्याचे जाहीर करण्यात आले. शुक्रवारी पहाटे दहशतवाद्यांनी पश्चिम अफगाणमधील हेरत शहरातील भारतीय वाणिज्य दूतावासावर मशीनगन, रॉकेट तसेच हातबॉम्बसह हल्ला केला. अफगाण पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी शेजारच्या घरातून गोळीबार सुरू केला. या दूतावासाच्या दोन इमारती या परिसरात आहेत. भारताचे येथील राजदूत अमर सिन्हा यांनी सांगितले की, इमारतीच्या भिंतीवर चढताना एक हल्लेखोर मारला गेला. या इमारतीत भारताच्या वाणिज्य दूतांचेही निवासस्थान आहे. हल्ला झाला तेव्हा दूतावासात ९ भारतीय होते व त्याखेरीज अफगाण नागरिकही होते. या चकमकीत चारही हल्लेखोर ठार झाल्याचे नवी दिल्ली येथे परराष्टÑ मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. एक हल्लेखोर भारत-तिबेट सीमा पोलिसांनी मारला, तर तीन दहशतवादी अफगाण सुरक्षा दलाच्या गोळीबारात मारले गेले. या दूतावासातील भारतीय कर्मचारी सुरक्षित असून, त्यांचे नीतिधैर्य कायम आहे.