मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 12:11 IST2026-04-05T12:10:45+5:302026-04-05T12:11:30+5:30
भारतीय हवाई संरक्षण भेदून इतक्या अंतरावरून अचूक हल्ला करू शकेल अशी क्षेपणास्त्र क्षमता पाकिस्तानकडे नाही.

मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
इस्लामाबाद - पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला पुन्हा एकदा खुली धमकी दिली आहे. जर भारताने कुठलेही 'फॉल्स फ्लॅग' ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला तर पाकिस्तानचं प्रत्युत्तर कोलकात्यापर्यंत पोहोचेल. भारत आपल्याच लोकांच्या मृतदेहाचा किंवा ताब्यात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना वापर करून दहशतवादी हल्ला घडवण्याची योजना आखत आहे असा दावा ख्वाजा आसिफ यांनी सियालकोट येथे पत्रकारांशी बोलताना केला. मात्र या दाव्याची कुठलीही पुष्टी करणारा पुरावा त्यांनी सादर केला नाही.
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अलीकडेच केलेल्या विधानावरून ख्वाजा आसिफ यांनी हे प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांच्या धमक्यांमधून 'ऑपरेशन सिंदूर' वेळी झालेल्या जखमा स्पष्टपणे दिसून येतात. गेल्या वर्षी मे महिन्यात 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानने दिल्लीसह अनेक भारतीय शहरांवर मिसाइल आणि ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न केला होता. परंतु भारतीय हवाई संरक्षण प्रणाली एस-४०० ने रोहतकमध्ये पाकिस्तानी हल्ले पूर्णपणे हाणून पाडले.
पाकिस्तानी हल्ल्याची हवाच काढली
मे २०२५ मध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि त्याच्या ताब्यातील काश्मीरमध्ये दहशतवादी तळांना टार्गेट केले. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. भारताच्या या हल्ल्याला उत्तर म्हणून पाकिस्तानने जवळपास ३००-४०० ड्रोन्स आणि अनेक मिसाइल हल्ला केला. ज्यात दिल्ली, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, लुधियाना आणि भूजसारख्या शहरांना निशाणा बनवले होते. भारतीय हवाई दलाच्या मल्टी लेयर्ड एअर डिफेन्स आणि S-400 सारख्या 'सुदर्शन चक्र'ने पाकिस्तानी हल्ला पूर्णपणे हाणून पाडला.
एस-४०० ने रोहतक परिसरात ३०० किलोमीटरहून अधिक अंतरावरून पाकिस्तानी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन पाडले. ऑपरेशन सिंदूरमध्ये जगाने एस-४०० ची क्षमता पाहिली. ही प्रणाली ६०० किलोमीटरपर्यंतची लक्ष्ये ओळखण्यास आणि ४०० किलोमीटरपर्यंत त्यांना नष्ट करण्यास सक्षम आहे. आकाश, स्पायडर आणि MRSAM सारख्या भारतीय लष्कराच्या इतर प्रणालींच्या मदतीने एस-४०० ने सीमेवरील पाकिस्तानचा संपूर्ण हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ला उधळून लावला. अखेरीस पाकिस्तानला शरणागती पत्करण्यास आणि भारताकडे शस्त्रसंधीसाठी विनंती करण्यास भाग पडले.
दरम्यान, आसिफ यांची धमकी केवळ एक पोकळ शाब्दिक डाव असल्याचा मानला जात आहे. कोलकाता दिल्लीपासून सुमारे १,३०० किलोमीटर अंतरावर आहे आणि भारतीय हवाई संरक्षण भेदून इतक्या अंतरावरून अचूक हल्ला करू शकेल अशी क्षेपणास्त्र क्षमता पाकिस्तानकडे नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानने दिल्लीच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला होता परंतु एस-४०० प्रणालीने रोहतकमध्येच त्याला रोखले. आता कोलकाताला धमकी देणे याचा अर्थ पाकिस्तान आपला पराभव विसरून जुन्याच गोष्टीची पुनरावृत्ती करत आहे हे दिसून येते.