"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 10:41 IST2025-06-23T10:41:16+5:302025-06-23T10:41:55+5:30

पाकिस्तानला शांतता हवी परंतु सिंधु जल करारावर भारताची कारवाई एका युद्धाच्या घोषणेसारखीच आहे असं विधान बिलावल भुट्टो यांनी केले आहे.

"India has only 2 options..."; Pakistan's Bilawal Bhutto reaction after Amit Shah's statement, direct threat of war | "भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी

"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी

इस्लामाबाद - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधु जल कराराला दिलेल्या स्थगितीचा वाद आणखी चिघळला आहे. अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यावर पाकचा थयथयाट झाला असून तिथले माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताला थेट युद्धाची पोकळ धमकी दिली आहे. भारताची सिंधु जल करारावरील स्थगिती उठवण्याचा कुठलाही विचार नाही असं अमित शाह यांनी म्हटले होते. त्यावर पाकिस्तानातील नेते बिथरले आहेत. पाकच्या परराष्ट्र मंत्रालयानेही शाहांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

बिलावल भुट्टो यांनी म्हटलं की, सिंधु जल करार पुन्हा पूर्ववत न केल्यास पाकिस्तान हल्ला करून सर्व ६ नद्यांवर कब्जा करू शकते. भारताकडे केवळ २ पर्याय आहेत. एकतर भारताने सिंधु जल करार सुरू ठेवावा, पुढे तेच राहावे अथवा पाकिस्तानसोबत युद्धास तयार राहावे असं त्यांनी एका रॅलीत म्हटलं आहे. याआधीही बिलावल भुट्टो यांनी सिंधु जल करारावर एक तर नद्यातून पाणी वाहेल नाहीतर रक्त वाहेल असं आक्रमक विधान केले होते. 

तसेच पाकिस्तानला शांतता हवी परंतु सिंधु जल करारावर भारताची कारवाई एका युद्धाच्या घोषणेसारखीच आहे. ही पाकिस्तानच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यासाठी कुठल्याही थराला जावे लागेल. आम्ही सिंधु सभ्यतेचे संरक्षक आहोत आणि त्याचे रक्षण करू आणि त्यासाठी युद्धाला सामोरे जायचीही आमची तयारी आहे. या मुद्द्यात आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप व्हावा लागेल. जर पाकिस्तानला मिळणारे पाणी रोखले तर युद्धाशिवाय अन्य पर्याय नाही असंही बिलावल भुट्टो यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेत सिंधु जल कराराला स्थगिती दिली होती. त्यावेळी जर भारताने सिंधु नदीचे पाणी थांबवले तर त्याला आम्ही युद्धाची घोषणा मानू असं पाकिस्तानने म्हटले. अलीकडेच भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी सिंधु जल करार पूर्ववत करण्याबाबत चर्चा फेटाळली. हा करार पुन्हा कधी पूर्ववत होणार नाही असं शाह यांनी स्पष्ट म्हटले. अमित शाह यांच्या विधानावरूनच पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे.

काय आहे सिंधु जल करार?

सिंधु जल करार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नद्यांच्या पाणी वाटपावर आहे. गेल्या ६ दशकापूर्वी या करारानुसार सिंधु, झेलम आणि चिनाब नद्यांचे पाणी पाकिस्तानला देण्याचे ठरले तर रावी, ब्यास आणि सतलुज नद्याचे पाणी भारताच्या वाट्याला आले. त्यामुळे सिंधु जल कराराला स्थगिती दिल्याने पाकमध्ये भविष्य काळात पाण्याचे मोठे संकट उभे राहणार आहे.

Web Title: "India has only 2 options..."; Pakistan's Bilawal Bhutto reaction after Amit Shah's statement, direct threat of war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.