आखात पेटले! इराणने बहरीनच्या सर्वात मोठ्या रिफायनरीवर हल्ला चढविला; आकाशात अजस्त्र धुराचे लोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 01:20 IST2026-03-06T01:20:03+5:302026-03-06T01:20:35+5:30
Bahrain Oil Refinery Attack: गेल्या आठवड्यात इराणचे सर्वोच्च नेते मारले गेल्यानंतर इराणने अमेरिका आणि इस्रायलच्या मित्रराष्ट्रांवर 'बदला' घेण्यास सुरुवात केली आहे. बहरीनमध्ये अमेरिकेच्या पाचव्या आरमारी ताफ्याचे मुख्यालय असल्याने इराणने बहरीनला लक्ष्य केल्याचे मानले जात आहे.

आखात पेटले! इराणने बहरीनच्या सर्वात मोठ्या रिफायनरीवर हल्ला चढविला; आकाशात अजस्त्र धुराचे लोट
मध्यपूर्वेतील युद्ध आता अधिक भीषण वळणावर पोहोचले आहे. इराणने बहरीनच्या सरकारी मालकीच्या 'बापको एनर्जीज' या मुख्य तेल रिफायनरीवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे रिफायनरीच्या एका युनिटमध्ये भीषण आग लागली असून परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले. बहरीन सरकारने या हल्ल्याची पुष्टी केली असून इराणच्या या कारवाईमुळे जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.
बहरीनच्या नॅशनल कम्युनिकेशन सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी इराणच्या दिशेने आलेल्या बॅलिस्टिक मिसाईल्सनी सित्रा बेटावर असलेल्या मुख्य रिफायनरीला लक्ष्य केले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मात्र, रिफायनरीच्या काही भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या आठवड्यात इराणचे सर्वोच्च नेते मारले गेल्यानंतर इराणने अमेरिका आणि इस्रायलच्या मित्रराष्ट्रांवर 'बदला' घेण्यास सुरुवात केली आहे. बहरीनमध्ये अमेरिकेच्या पाचव्या आरमारी ताफ्याचे मुख्यालय असल्याने इराणने बहरीनला लक्ष्य केल्याचे मानले जात आहे. बहरीनच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, त्यांनी आतापर्यंत इराणची ७५ हून अधिक क्षेपणास्त्रे पाडली आहेत.
जागतिक परिणाम
या हल्ल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. बहरीनची ही रिफायनरी दिवसाला सुमारे ४ लाख बॅरल तेल शुद्धीकरण करते. या हल्ल्यामुळे तेल पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे.
जागतिक तेल बाजारात भूकंप
या हल्ल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल ५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) इराणने अंशतः बंद केल्याने जागतिक तेल पुरवठा साखळी धोक्यात आली आहे. याचा थेट फटका भारत आणि इतर आशियाई देशांना बसण्याची शक्यता आहे.