भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 07:54 IST2026-04-08T07:52:37+5:302026-04-08T07:54:48+5:30
America Iran War: अमेरिका आणि इराणमध्ये शस्त्रसंधी झाली असली, तरी प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत संवेदनशील असल्याचे म्हटले जात आहे.

भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
America Iran War:अमेरिका आणि इराण यांच्यात अखेर शस्त्रसंधी झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले युद्ध थांबले आहे. यामुळे संपूर्ण जगाला दिलासा मिळाला आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी होत आहेत. तसेच पुरवठाही आता सुरळीत होईल, असे म्हटले जात आहे. अमेरिका आणि इराण या दोन देशांमध्ये शस्त्रसंधी झाली असली, तरी आखाती देश मात्र अजूनही तणावात असल्याचे दिसत आहेत. शस्त्रसंधी झाल्याच्या काही तासांतच आखाती देशातील काही ठिकाणी अचानक सायरन वाजू लागले. त्यामुळे संपूर्ण सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे.
सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतर यासह सगळ्या आखाती देशात हाय अलर्ट देण्यात आला आहे. इराणकडून क्षेपणास्त्र डागल्याचा दावा इस्रायलने केला आहे. तर दुसरीकडे कुवैतच्या लष्कराने स्पष्टपणे सांगितले की, त्यांची हवाई संरक्षण यंत्रणा शत्रूचे क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले रोखत आहे. बहरीनमध्ये गृह मंत्रालयाने हाय अलर्ट जारी केला आहे. लोकांना तात्काळ स्थलांतरित होण्याचे आवाहन केले.
आम्ही इराणकडून होणारे क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले रोखतोय
सौदी अरेबियाच्या नागरी संरक्षण विभागानेही आपल्या पूर्वेकडील प्रदेशांमध्ये आणि राजधानी रियाधमध्ये पूर्वसूचना जारी केल्याने जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संयुक्त अरब अमिरातीने दुजोरा देत सांगितले की, त्यांची हवाई संरक्षण यंत्रणा इराणकडून होणारे क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले सक्रियपणे रोखत आहे. कतारने आपल्या नागरिकांना घरातच थांबण्याचा सल्ला दिला आणि हाय अलर्ट असल्याचे जाहीर केले. अमेरिका आणि इराणमध्ये शस्त्रसंधी झाली असली, तरी प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत संवेदनशील असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, इराणने डागलेली क्षेपणास्त्रे त्यांच्या निदर्शनास आली असून, ती रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे. तसेच जोपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे पुन्हा उघडली जात नाही, तोपर्यंत इराणचे हल्ले सुरू राहण्याची शक्यता आहे, असे काही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. होर्मुझ सामुद्रधुनी या संघर्षाचे केंद्र बनली आहे. जगातील तेलपुरवठ्याचा मोठा भार याच मार्गावर आहे. ती बंद झाल्यास जागतिक अर्थव्यवस्था विस्कळीत होऊ शकते, असे सांगितले जात आहे.