मोदींना निरोप अन् इराणची 'तबाही' सुरू...! हीच वेळ का निवडली? काय होतं 'टायमिंग'चं रहस्य? इस्रायलनं स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 11:15 IST2026-03-04T11:14:45+5:302026-03-04T11:15:38+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात २६ फेब्रुवारी रोजी द्विपक्षीय चर्चा झाली. या ऐतिहासिक दौऱ्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात मोठी लष्करी मोहीम सुरू केली.

मोदींना निरोप अन् इराणची 'तबाही' सुरू...! हीच वेळ का निवडली? काय होतं 'टायमिंग'चं रहस्य? इस्रायलनं स्पष्टच सांगितलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यानंतर, काही वेळातच इराणवर झालेल्या भीषण हल्ल्याने जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. इस्रायलनेइराणवरील हल्ल्यासाठी हीच वेळ का निवडली? काय होतं 'टायमिंग'चं रहस्य? असे प्रश्नही अनेकांना पडले. यासंदर्भात आता भारतामधील इस्रायलचे राजदूत रुवेन अझार यांनी महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. हा हल्ला कोणत्याही पूर्वनियोजित योजनेचा भाग नसून, पंतप्रधान मोदी इस्रायलमधून परतल्यानंतर, मिळालेल्या एका 'ऑपरेशनल संधी'चा परिणाम आहे. असे अझार यांनी स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान मोदींचा दौरा आणि हल्ल्याचं टायमिंग -
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात २६ फेब्रुवारी रोजी द्विपक्षीय चर्चा झाली. या भेटीत दोन्ही देशांनी १७ महत्त्वाचे करार केले आणि आपली धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत केली. या ऐतिहासिक दौऱ्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात मोठी लष्करी मोहीम सुरू केली.
या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अझार म्हणाले, "पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान या संभाव्य हल्ल्याची माहिती खुद्द इस्रायललाही नव्हती. प्रादेशिक विकासावर चर्चा झाली, मात्र जी बाब आम्हालाच माहित नव्हती, ती आम्ही सामायिक करू शकत नव्हतो. या हल्ल्याला शनिवारी सकाळी सुरक्षा कॅबिनेटची मंजुरी मिळाली."
दशकांची तयारी अन् गुप्तचर यंत्रणेचं यश -
अझार म्हणाले, "इराणच्या धमक्यांमुळे, इस्रायलने गेल्या अनेक वर्षांत आपल्या लष्करी आणि गुप्तचर क्षमता वाढवण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. इराणी राजवटीचे कामकाज, त्याची लष्करी यंत्रणा, त्याची निर्णय घेणाऱ्यांची ओळख आणि त्यांची ठिकाणं अचूकपणे समजून घेणे हे प्राथमिक उद्दिष्ट होते. याशिवाय, इराण आणि त्याच्या प्रॉक्सी गटांनी क्षेपणास्त्रे आणि रॉकेट रोखण्यासाठी, तसेच, इराणची हवाई संरक्षण प्रणाली भेदण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित केले. यामुळेच हा हल्ला यशस्वी होऊ शकला, असेही ते म्हणाले.