युद्धामुळे शिक्षण कोलमडले! आखाती देशांतील CBSE १२ वीच्या परीक्षा रद्द; भारतावर काय परिणाम होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 12:11 IST2026-03-15T12:09:48+5:302026-03-15T12:11:19+5:30
CBSE Class 12 Exams Cancelled in Middle East: युद्धाचा फटका! आखाती देशांतील सीबीएसई १२ वीच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. वाचा काय असेल निकालाची नवी पद्धत.

युद्धामुळे शिक्षण कोलमडले! आखाती देशांतील CBSE १२ वीच्या परीक्षा रद्द; भारतावर काय परिणाम होणार?
मध्य आशियातील युद्धजन्य परिस्थितीने आता शैक्षणिक क्षेत्रालाही ग्रासले आहे. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आखाती देशांतील १२ वीच्या उर्वरित सर्व बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो भारतीय विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हा निर्णय प्रामुख्याने बहरीन, इराण, कुवैत, ओमान, कतर, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील सीबीएसई संलग्न शाळांसाठी लागू आहे. याआधी १० वीच्या परीक्षा आधीच रद्द करण्यात आल्या होत्या, मात्र आता परिस्थिती अधिक बिकट झाल्याने १२ वीच्या १६ मार्च ते १० एप्रिल २०२६ दरम्यान होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या निकालाचे काय होणार?
सीबीएसईने स्पष्ट केले आहे की, ज्या परीक्षा रद्द झाल्या आहेत, त्यांच्या निकालासाठी एक स्वतंत्र 'मार्किंग स्कीम' तयार केली जाईल. जे पेपर्स युद्ध सुरू होण्यापूर्वी झाले आहेत, त्यांचे गुण ग्राह्य धरले जातील. अंतर्गत मूल्यमापन किंवा प्री-बोर्ड परीक्षांच्या आधारे निकाल लावण्याबाबत लवकरच अधिकृत सूचना दिल्या जातील.
मानसिक ताण
युद्ध, सततचे क्षेपणास्त्र हल्ले आणि अनिश्चितता यामुळे विद्यार्थी मोठ्या मानसिक तणावात होते, हे लक्षात घेऊन बोर्डाने हा कठोर निर्णय घेतला आहे.
पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
आखाती देशांत राहणाऱ्या भारतीय पालकांमध्ये आता मुलांच्या उच्च शिक्षणाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः ज्यांना भारतात वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी प्रवेश घ्यायचे आहेत, त्यांच्यासाठी बोर्डाचा निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.