आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 09:14 IST2025-06-03T09:13:38+5:302025-06-03T09:14:36+5:30
आम्ही कोणाच्याही दारात भिकेचा कटोरा घेऊन उभे नाही आहोत, आम्ही फक्त तुम्हाला इशारा देण्यासाठी आलो आहोत, भाजपचे खासदार समिक भट्टाचार्य म्हणाले.

आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
BJP MP Samik Bhattacharya Speech: पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरद्वारेपाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर, भारत आता जागतिक स्तरावर पाकिस्तानची पोलखोल करत आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर भारताची जगभरातील सर्वपक्षीय शिष्टमंडळे सध्या पाकचा खोटेपणा उघड करत आहेत. अशातच लंडनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात, भाजपचे खासदार समिक भट्टाचार्य यांनी पाकिस्तानातल्या दहशतवादावरुन कडक इशारा दिला. आमच्यासोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही होऊ शकतो हेच सांगायला इथे आलो असल्याचे समिक भट्टाचार्य म्हणाले. यावेळी भट्टाचार्य यांनी इंग्लंडचे नाव न घेता, भारतावरील इंग्लंडच्या राजवटीचा आणि त्यांनी लुटलेल्या संपत्तीचाही उल्लेख केला.
दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर, भारत जगभरात सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या माध्यमातून आपली बाजू मांडत आहे. भारतीय शिष्टमंडळे सातत्याने जगाला दहशतवादापासून सावध राहण्याचे आवाहन करत आहे. तसेच पाकिस्तानचा खरा चेहरा देखील जगासमोर आणत आहेत. यादरम्यान सोमवारी लंडनमध्ये एका कार्यक्रमादरम्यान भाजप खासदार समिक भट्टाचार्य यांनी स्पष्ट शब्दात भारत जगाकडून कोणतीही भीक मागत नाहीये, तर दहशतवादाच्या वाढत्या धोक्याविरुद्ध स्पष्ट इशारा देत आहे असं म्हटलं.
"भारत हातात वाटी घेऊन कोणाच्याही दारावर उभा नाहीये. आम्ही जगभर फिरत आहोत. आम्ही युरोपमध्ये येऊन कोणाचेही दार ठोठावून कहों ना प्यार है, कहो ना प्यार है? असं म्हणत नाही आहोत. आम्ही इथे भिक्षा मागण्यासाठी आलो नाहीये. आम्ही इथे इशारा देण्यासाठी आलो आहोत, सावध करण्यासाठी आलो आहोत की आज आमच्यासोबत जे काही घडत आहे, उद्या तुमच्यासोबतही तेच घडणार आहे. तुम्ही किती रक्त सांडणार आहात? आमची लोकसंख्या १४० कोटी आहे," असं समिक भट्टाचार्य म्हणाले.
#WATCH | London, UK | BJP MP Samik Bhattacharya says, "We are not at the doors of anyone with a begging bowl... We are here to alert all that what is happening with us will happen to you tomorrow... Countries change their stance to sell ammunition; they preach to us about… pic.twitter.com/pONoy6kjHi
— ANI (@ANI) June 2, 2025
"काही देश शस्त्रे विकण्यासाठी त्यांची भूमिका बदलतात आणि आम्हाला संवाद साधण्याचा सल्ला देतात. ते म्हणतात की सर्व काही संवादाने सोडवता येते, परंतु त्यांचा हेतू काहीतरी वेगळाच आहे. पण आज संपूर्ण जग 'मोदी-मोदी'चा जयजयकार करत आहे कारण पंतप्रधान मोदी हे दहशतवादाच्या विरुद्धच्या लढाईचे प्रतीक बनले आहेत," असेही भट्टाचार्य म्हणाले.
नाव न घेता इंग्लंडलाही सुनावलं
इंग्लंडचे नाव न घेता त्यांनी संपत्ती लुटल्याचे भट्टाचार्य म्हणाले. "भारत गरीब नाही. अनेक लोकांनी आपल्याला लुटले आहे आणि त्यांचे भव्य महाल बांधले आहेत. तुम्ही आणखी किती लुटणार?" असं भट्टाचार्य म्हणाले.