बांगलादेशला उपरती! नव्या क्रीडा मंत्र्यांनी शपथविधीवेळी घेतली भारतीय उपउच्चायुक्तांची भेट; म्हणाले, आम्ही वर्ल्डकप खेळू शकलो असतो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 12:15 IST2026-02-19T12:14:08+5:302026-02-19T12:15:50+5:30
T20 World Cup 2026 Bangladesh news : टी-२० विश्वचषक २०२६ मधील नाट्यमय घडामोडींनंतर आता बांगलादेशने भारतासोबतचे क्रिकेट संबंध सुधारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. क्रीडा मंत्री अमिनुल हक यांनी मैत्रीचा हात पुढे केला.

बांगलादेशला उपरती! नव्या क्रीडा मंत्र्यांनी शपथविधीवेळी घेतली भारतीय उपउच्चायुक्तांची भेट; म्हणाले, आम्ही वर्ल्डकप खेळू शकलो असतो...
टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतात येण्यास नकार दिल्याने आयसीसीच्या कारवाईला सामोरे जावे लागलेल्या बांगलादेशने आता भारतासोबतचे क्रिकेट संबंध सुधारण्यासाठी पावले उचलली आहेत. बांगलादेशमध्ये सत्तेवर आलेल्या नव्या 'बीएनपी' सरकारचे क्रीडा मंत्री अमिनुल हक यांनी भारतासोबतचे मतभेद मैत्रीपूर्ण चर्चेद्वारे सोडवण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांमधील क्रिकेट क्षेत्रात निर्माण झालेला तणाव कमी होण्याची चिन्हे आहेत.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
डिसेंबर २०२४ मध्ये मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमधून काढू टाकल्यानंतर या वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने सुरक्षेचे कारण देत आपला संघ भारतात टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी पाठवण्यास नकार दिला होता. आयसीसीने ही विनंती फेटाळून लावत बांगलादेशच्या जागी स्कॉटलंड संघाला विश्वचषकात स्थान दिले होते. या निर्णयामुळे बांगलादेशला इतिहासात पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकाला मुकावे लागले.
नव्या क्रीडा मंत्र्यांचा पुढाकार
अमिनुल हक यांनी पदभार स्वीकारताच भारताच्या उपउच्चायुक्तांशी चर्चा केली. ते म्हणाले, "आम्हाला भारतासोबतचे संबंध पुन्हा प्रस्थापित करायचे आहेत. जुन्या बीसीबी प्रशासनाचे निर्णय संशयास्पद होते आणि त्यामुळेच क्रिकेटचे नुकसान झाले. हे प्रकरण नीट हाताळले गेले असते तर आम्ही वर्ल्डकप खेळू शकलो असतो."
शाकिब आणि मुर्तझा यांचे पुनरागमन होणार?
क्रीडा मंत्र्यांनी केवळ भारतासोबतच्या संबंधांवरच भाष्य केले नाही, तर अवामी लीगच्या काळातील खेळाडू शाकिब अल हसन आणि मश्रफी मुर्तझा यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याबाबतही सूतोवाच केले. हे दोन्ही दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा बांगलादेशच्या जर्सीत दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.