बांग्लादेशात परिस्थिती चिघळली; स्वतःच्या सुरक्षेची मागणी करत पोलिसांनीच पुकारला संप...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 21:23 IST2024-08-06T21:23:08+5:302024-08-06T21:23:46+5:30
बांग्लादेशातील हिंसाचारात शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून, यातील बहुतांश पोलीस कर्मचारी आहेत.

बांग्लादेशात परिस्थिती चिघळली; स्वतःच्या सुरक्षेची मागणी करत पोलिसांनीच पुकारला संप...
Bangladesh Sheikh Hasina : बांग्लादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर देशभरातील पोलिसांनी संप पुकारला आहे. सुरक्षेच्या मागणीसाठी बांगलादेशातील पोलीस संपावर गेले आहेत. शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर आतापर्यंत 400 पोलिस ठाण्यांवर हल्ले झाले आहेत, ज्यामध्ये अनेक पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशाची पोलिस संघटना 'बांग्लादेश पोलिस सर्व्हिस असोसिएशन'ने म्हटले की, जोपर्यंत प्रत्येक पोलिसाची सुरक्षा सुनिश्चित केली जात नाही, तोपर्यंत पोलिस कर्मचारी संपावरच राहणार आहे. संघटनेने आपल्या निवेदनात निष्पाप विद्यार्थ्यांवर्यू केलेल्या कारवाईबद्दल माफीही मागितली आहे.
शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ; आधी युकेने नकार दिला, आता अमेरिकेने व्हिसा रद्द केला...
अमित शाहंनी बोलावली बैठक
बांग्लादेशातील सतत बिघडत चाललेल्या परिस्थितीवर गृहमंत्री अमित शाह यांनी आज महत्त्वपूर्ण बैठक घेतली. संसद भवनात झालेल्या या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, एनएसए अजित डोवाल आणि गृह सचिव यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत बांग्लादेशातील परिस्थिती आणि सीमा सुरक्षा यावर चर्चा झाली. दरम्यान, भारत बांग्लादेशच्या लष्करप्रमुखांच्या संपर्कात असून, तेथील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे.
दोन महिन्यांपूर्वी शेख हसीना यांनी व्यक्त केलेली भीती होतेय खरी, होणार नव्या देशाचा जन्म?
भारत-बांग्लादेश सीमा सील
बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) सतर्क आहे. बीएसएफने सोमवारीच 4,096 किमी लांबीच्या भारत-बांग्लादेश सीमेवरील सर्व युनिट्ससाठी हाय अलर्ट जारी केला असून, संपूर्ण सीमा सील करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बांग्लादेशची सर्वाधिक 2200 किमी लांबीची सीमा पश्चिम बंगालशी लागून आहे आणि हाच भाग अत्यंत संवेदनशील आहे. ताज्या घडामोडी लक्षात घेऊन बीएसएफचे कार्यवाहक महासंचालक (डीजी) दलजित सिंग चौधरी यांनी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी भारत-बांग्लादेश सीमेचा दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेतला.
बांग्लादेशातील आंदोलनाची आग अमेरिकेपर्यंत पोहोचली; आंदोलक बांग्लादेशी दूतावासात घुसले...
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली
मंगळवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बांग्लादेशातील परिस्थितीवर राज्यसभेत निवेदन दिले आणि भारताची भूमिका स्पष्ट केली. बांग्लादेशात लोक रस्त्यावर उतरले आहेत आणि तेथील अल्पसंख्याक समुदाय हिंदूंना लक्ष्य करण्यात येत आहे, असे परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. याशिवाय, केंद्र सरकार या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती त्यांनी संसदेत दिली.