IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 17:15 IST2025-06-04T17:15:13+5:302025-06-04T17:15:51+5:30
Pakistan News: दहशतवादाला खतपाणी घालण्याचा इतिहास असल्याने पाकिस्तानला कोणत्याही प्रकारच्या मदतीवर भारताने तीव्र आक्षेप घेतला होता.

IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन
India-Pakistan: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानवर जोरदार प्रहार केला. याशिवाय, सिंधू पाणी करार स्थगित करणे आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगसमोर आणण्याचे काम सुरू आहे. तसेच, पाकला मिळणारी आर्थिक मदत रोखण्याचा प्रयत्नही भारताकडून सुरू आहे. पण, यामध्ये अद्याप भारताला पूर्णपणे यश मिळाले नाही. पाकिस्तानला आयएमएफनंतर आता आशियाई विकास बँकेकडून (ADB) 800 मिलियन अमेरिकन डॉलर्सची मदत मिळाली आहे. भारताच्या विरोधाला न जुमानता ADB ने हे पाऊल उचलले आहे.
भारताचा तीव्र आक्षेप
दहशतवादाला खतपाणी घालण्याचा इतिहास असल्याने पाकिस्तानला कोणत्याही प्रकारच्या मदतीवर भारताने तीव्र आक्षेप घेतला होता. यापूर्वी, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पाकिस्तानला सुमारे 8,500 कोटी रुपयांचे बेलआउट पॅकेज जारी केले होते. भारताने कर्जाच्या रकमेच्या गैरवापराबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
'पाकिस्तानच्या कर प्रणालीत सुधारणा केली जाईल'
पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांचे सल्लागार खुर्रम शहजाद म्हणाले की, सुधारणा कार्यक्रमांतर्गत एडीबीने पाकिस्तानसाठी 800 मिलियन अमेरिकन डॉलर्सचे बेलआउट पॅकेज मंजूर केले आहे. पाकिस्तानचे उद्दिष्ट देशांतर्गत संसाधने एकत्रित करणे आणि आर्थिक सुधारणांद्वारे अर्थव्यवस्था स्थिर करणे आहे. ही मदत कर प्रणाली सुधारेल आणि महसूल वाढवेल. आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
'पाकिस्तान विकासाऐवजी दहशतवादावर खर्च करेल'
भारत म्हणतो की, पाकिस्तान एडीबी आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मिळालेल्या कर्जाचा वापर आपल्या देशाच्या विकासाऐवजी दहशतवाद आणि लष्करी खर्चासाठी करतो. एडीबी आणि आयएमएफकडून अनेक कर्जे घेऊनही पाकिस्तान वारंवार आर्थिक सुधारणा लागू करण्यात अपयशी ठरला आहे. तेथील सरकारच्या प्रत्येक निर्णयात सैन्य हस्तक्षेप करते, असा आरोपही भारताने केला आहे.