आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 12:19 IST2025-08-22T12:18:49+5:302025-08-22T12:19:29+5:30
महत्वाचे म्हणजे, दोन्ही देशांकडून रशियाला भारतीय निर्यात वाढविण्यासह द्विपक्षीय व्यापार वाढवण्याचा हा संकल्प, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार आणि टॅरिफ धोरणांमुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये दरी वाढत असतानाच करण्यात आला आहे.

आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
भारत आणि रशियाने गुरुवारी आपला द्विपक्षीय व्यापार संतुलित पद्धतीने वाढवण्याचा आणि ऊर्जा सहकार्य कायम ठेवण्याचा संकल्प केला. याच वेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नॉन-टॅरिफ अडथळे आणि नियामक अडथळे लवकरात लवकर दूर करण्याची आवश्यकताही अधोरेखित केली. महत्वाचे म्हणजे, दोन्ही देशांकडून रशियालाभारतीय निर्यात वाढविण्यासह द्विपक्षीय व्यापार वाढवण्याचा हा संकल्प, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार आणि टॅरिफ धोरणांमुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये दरी वाढत असतानाच करण्यात आला आहे.
रशियन समकक्ष सर्गेई लावरोव्ह यांच्यासोबतच्या व्यापक चर्चेनंतर, संयुक्त पत्रकार परिषदेत जयशंकर म्हणाले, "भारत-रशिया संबंध हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे जगातील सर्वात प्रमुख संबंधांपैकी एक आहेत," असे आम्हाला वाटते. तसेच, भू-राजकीय परिस्थिती, जन भावना आणि नेतृत्व संपर्क हे याचे प्रमुख घटक राहतील," असेही जयशंकर म्हणाले. खरे तर, नोव्हेंबर अथवा डिसेंबर महिन्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर येत आहेत,या दृष्टीने विविध पैलूंना अंतिम रूप देण्यासाठी जयशंकर मंगळवारी (१९ ऑगस्ट) मॉस्को येथे पोहोचले.
द्विपक्षीय व्यापाराला प्रोत्साहन देणे लक्ष -
जयशंकर आणि लावरोव्ह यांनी दहशतवादाचा सामना करण्याच्या पद्धतींवरही चर्चा केली. जयशंकर म्हणाले, "दहशतवादाच्या मुद्द्यावर, आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादविरुद्ध एकत्रितपणे लढण्याचा संकल्प केला. मी कुठल्याही परिस्थितीत दहशतवाद सहन न करण्याचा भारताचा द्दढ संकल्प आणि सीमा पार दहशतवादापासून आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याचा आपला सार्वभौम अधिकार व्यक्त केला."
द्विपक्षीय व्यापार वाढवण्याचा प्रयत्न -
परराष्ट्रमंत्री म्हणाले, "आपण रशियाला भारताची निर्यात वाढवण्यासह संतुलित आणि शाश्वत पद्धतीने द्विपक्षीय व्यापार वाढवण्याच्या सामायिक महत्त्वाकांक्षेची पुष्टी केली. यासाठी नॉन-टेरिफ अडथळे आणि नियामक अडथळे त्वरित दूर करणे आवश्यक आहे. औषधनिर्माण, शेती आणि वस्त्रोद्योग यांसारख्या क्षेत्रात रशियाला भारतीय निर्यात वाढवल्याने विद्यमान असमतोल दूर होण्यास निश्चितच मदत होईल.
जयशंकर पुढे म्हणाले, "खतांचा दीर्घकालीन पुरवठा सुनिश्चित करण्यासंदर्भातही पावले उचलण्यात आली आहेत. भारतीय कुशल कामगार, विशेषतः आयटी, बांधकाम आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील कामगार, रशियाची कामगार गरज पूर्ण करू शकतात आणि सहकार्य अधिक बळकट करू शकतात." ते म्हणाले, व्यापार आणि गुंतवणुकीद्वारे ऊर्जा सहकार्य राखणेही महत्त्वाचे आहे.