अफगाण-पाक संघर्ष; पाच दिवसांत 150 पाकिस्तानी सैनिक मारले, तालिबानचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 12:34 IST2026-03-04T12:32:13+5:302026-03-04T12:34:30+5:30
Afghanistan-Pakistan Conflict: अफगाण सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानच्या 40 सैन्य चौक्यांवर आणि 4 बेसवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे.

अफगाण-पाक संघर्ष; पाच दिवसांत 150 पाकिस्तानी सैनिक मारले, तालिबानचा दावा
Afghanistan-Pakistan Conflict: अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील डूरंड लाईन सीमेवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला तणाव आता उघड सशस्त्र संघर्षात बदलला आहे. अशातच, अफगाण सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानच्या 40 सैन्य चौक्यांवर आणि 4 बेसवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अफगाण सीमा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील पाच दिवसांत झालेल्या संघर्षात 150 पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून, जवळपास 200 सैनिक जखमी झाले आहेत.
अफगाण फोर्सचा मोठा दावा
अफगाण सीमा दलाचे प्रवक्ते अब्दुल्लाह उकाब यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, अफगाण-तालिबान डिफेन्स फोर्सने पाकिस्तानच्या अनेक लष्करी पोस्टवर हल्ला करून ताबा मिळवला आहे. त्यांनी अफगाण संरक्षण मंत्र्यांच्या वक्तव्याचा हवाला देत सांगितले की, पाकिस्तानकडून कोणतीही आक्रमक कारवाई झाल्यास त्याला उत्तर देण्यासाठी अफगाण दल पूर्णपणे सज्ज आहे.

पाकिस्तानी ड्रोन पाडल्याचा दावा
पाकिस्तान सीमा भागात ड्रोनच्या माध्यमातून हेरगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आम्ही कारवाई करत पाकिस्तानकडून पाठवण्यात आलेले काही ड्रोन पाडल्याचा दावा अफगान दलाने केला. यामध्ये एक स्मॉल इंटेलिजन्स ड्रोन देखील नष्ट करण्यात आल्याचे अफगाण अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
अफगाण-तालिबान गटाने काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडिओंमध्ये त्यांच्या लढवय्यांना पाकिस्तानी सैन्याच्या पोस्टवर ताबा घेताना दाखवण्यात आले आहे. काही दृश्यांमध्ये पाकिस्तानी सैनिकांची शस्त्रे, वायरलेस सेट आणि इतर लष्करी साहित्य अफगाण लढवय्यांच्या हाती लागल्याचे दिसत आहे. हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून दोन्ही देशांमध्ये प्रचारयुद्धही तीव्र झाले आहे.
पाकिस्तानकडून प्रतिदावा
अफगाणिस्तानने केलेल्या या दाव्यांवर पाकिस्तान सरकार किंवा सैन्याने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी उलट दावा करत सांगितले की, त्यांच्या कारवाईत अफगाण तालिबानचे शेकडो लढवय्ये ठार झाले असून पाकिस्ताननेही काही ठिकाणी नियंत्रण मिळवले आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांसह (UN) अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. चर्चेच्या माध्यमातून हा वाद सोडवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. या संघर्षामुळे सीमाभागातील परिस्थिती अस्थिर झाली असून हजारो नागरिकांना आपली घरे सोडून विस्थापित व्हावे लागले आहे.