अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 17:03 IST2026-04-08T17:03:00+5:302026-04-08T17:03:49+5:30
Indians in Tehran Safety: भारतात इराणचे प्रतिनिधी डॉ. अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी युद्धविरामानंतर अमेरिकेवर टीका केली आहे. इराणमधील भारतीयांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता असल्याचे त्यांनी म्हटले. वाचा सविस्तर वृत्त.

अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर, भारतातइराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयतुल्ला खोमेनी यांचे प्रतिनिधी डॉ. अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी इराणमध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेबाबत मोठी माहिती दिली आहे. "इराणमधील भारतीय बंधू-भगिनींची काळजी घेणे ही केवळ आमची प्राथमिकता नाही, तर ते माझे कर्तव्य आणि जबाबदारी आहे," असे भावूक उद्गार त्यांनी काढले आहेत.
डॉ. इलाही यांनी एका प्रसंगाचा उल्लेख करत भारतीयांप्रति असलेल्या आदराची भावना व्यक्त केली. "चाळीस दिवसांपूर्वी जेव्हा युद्ध सुरू झाले, तेव्हा मी इराणमधील माझ्या पाहुण्यांना, सहकाऱ्यांना तातडीने संदेश पाठवला होता. तेहरानसह विविध शहरांमधील विद्यापीठांत शिकणाऱ्या सुमारे ३,००० भारतीय विद्यार्थ्यांना (ज्यामध्ये बहुतांश वैद्यकीय क्षेत्रातील होते) सुरक्षित स्थळी हलवण्याची विनंती मी केली होती," असे त्यांनी सांगितले.
हॉटेल आणि निवासाची सोय
भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी इराण सरकारने स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्यासाठी हॉस्टेल, हॉटेल्स आणि इतर निवासस्थाने भाड्याने घेतली होती. "आम्ही आमच्या लोकांना स्पष्ट आदेश दिले होते की, भारतीय विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित जागी पोहोचवा. तेहरानमधील भारतीय दूतावासानेही त्यावेळी मोलाचे सहकार्य केले होते आणि सर्व विद्यार्थी सुखरूप होते," अशी आठवण डॉ. इलाही यांनी सांगितली.
युद्ध इराणवर लादले गेले
डॉ. इलाही यांनी स्पष्ट केले की, इराणला हे युद्ध नको होते. "हे युद्ध आमच्यावर लादण्यात आले आहे. अमेरिका आणि इस्रायलनेच इराणच्या नागरिक आणि घरांवर हल्ले करून या संघर्षाची सुरुवात केली. पण जेव्हा त्यांना समजले की ते इराणची 'सभ्यता' नष्ट करू शकत नाहीत, तेव्हा त्यांना आपली चूक उमजली," असे त्यांनी म्हटले.
होर्मुझ सामुद्रधुनी आणि लेबनॉनचा पेच
होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत बोलताना डॉ. इलाही म्हणाले की, "हे इराणच्या हातात आहे की तिथे काय करायचे. युद्धापूर्वी हा मार्ग सर्वांसाठी खुला होता. आम्हाला आशा आहे की हा युद्धविराम कायम राहील आणि अमेरिका पुन्हा युद्ध सुरू करण्याची चूक करणार नाही." तसेच, इस्रायलने लेबनॉनवरील हल्ले सुरूच ठेवण्याच्या विधानावर त्यांनी सावध प्रतिक्रिया देत, इराणच्या १० अटींवर चर्चा सुरू असल्याचे सांगितले.