मध्य पूर्वेतील युद्धामुळे पुण्याचे ८४ विद्यार्थी, १४ नागरिक अन् ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 09:31 IST2026-03-02T09:30:18+5:302026-03-02T09:31:13+5:30
मुले आणि संस्थेतील स्टाफच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य आहे. आम्ही या विद्यार्थ्यांशी संपर्कात आहोत असं शिक्षण संस्थेने सांगितले आहे.

मध्य पूर्वेतील युद्धामुळे पुण्याचे ८४ विद्यार्थी, १४ नागरिक अन् ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले
दुबई - मध्य पूर्वेत भडकलेल्या युद्धाची झळ भारतीयांना बसली आहे. पुण्यातील एका शिक्षण संस्थेचे ८४ एमबीएचे विद्यार्थी आणि ४ कर्मचारी दुबईत अडकले आहेत. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे हवाई मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना भारतात परतायला उशीर होत आहे. इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीचे विद्यार्थी ५ दिवसांच्या वार्षिक स्टडी टूरसाठी दुबई दौऱ्यावर गेले होते. सध्या सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत त्यांना दुबईतील एका हॉटेलमध्ये शिफ्ट करण्यात आल्याची माहिती संस्था प्रशासनाने दिली आहे.
या ८४ विद्यार्थ्यांपैकी ४० विद्यार्थी शनिवारी पुण्यात परतणार होते तर उर्वरित ४४ विद्यार्थ्यांची रविवारी फ्लाईट होती. परंतु अमेरिकाइस्रायलनेइराणवर हल्ला केला त्यानंतर आक्रमक इराणने कुवैत, यूएईसह अन्य देशांवरही हल्ले केले. त्यामुळे तातडीने या ठिकाणची एअरस्पेस बंद करण्यात आली. एअरस्पेस बंद झाल्याने अनेक उड्डाणे रद्द झाली. या घटनेमुळे अनेक प्रवासी दुबईत अडकले. पुण्यातील इंदिरा शिक्षण संस्थेकडून सरकार आणि संबंधित यंत्रणांशी संपर्क साधला जात आहे. मुले आणि त्यांच्यासोबत गेलेल्या स्टाफला सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मुले आणि संस्थेतील स्टाफच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य आहे. आम्ही या विद्यार्थ्यांशी संपर्कात आहोत. त्याशिवाय भारताच्या परराष्ट्र खात्याशी, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाशीही समन्वय साधला जात आहे. जशी एअरस्पेस उघडतील तसे या विद्यार्थ्यांना परत आणण्यात येईल असं इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा तारिता शंकर यांनी सांगितले आहे. संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या पालकांना परिस्थितीची माहिती दिली आहे. त्यांच्या सुरक्षेबाबतही संस्थेने पालकांना कळवले आहे. दुबईतील हॉटेल प्रशासनाशी थेट संपर्क साधत विद्यार्थ्यांसाठी सर्व आवश्यक सुविधा आणि सुरक्षेची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. पुणे जिल्ह्यातील प्रशासनाने या विद्यार्थ्यांसोबतच अनेक १० लोक अडकल्याची माहिती दिली असून तेदेखील सुरक्षित असल्याची पुष्टी केली आहे.
ठाण्यातील २३ लोक दुबईत अडकले
पुण्याप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील २३ जण दुबईत अडकले आहेत. त्यात १२ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. हे लोक कल्याण, शहापूर, मुरबाड तालुक्यातील आहेत. २३ फेब्रुवारीला पर्यटनासाठी ते दुबईत गेले होते. रविवारी हे सगळे मायदेशी परतणार होते परंतु एअरस्पेस बंद झाल्याने त्यांना भारतात परतता आले नाही. या लोकांशीही संपर्क साधण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात मारले गेल्याची पुष्टी इराणच्या सरकारी माध्यमांनी दिली आहे. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराण आक्रमक झाला आहे. त्यानंतर इस्रायलसह कुवैत, यूएई आणि इतर देशांवर इराणने हल्ला केला. त्यामुळे मध्य पूर्वेत अशांतता पसरली आहे.