आखातात ४३ भारतीय मालवाहू जहाजे अडकली, तेल टँकर होताहेत लक्ष्य; अनेक जहाजांनी मार्ग बदलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 05:24 IST2026-03-08T05:23:58+5:302026-03-08T05:24:20+5:30
मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे होर्मुझची सामुद्रधुनी या महत्त्वाच्या सागरी मार्गावरील जहाज वाहतूक आठ दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे.

आखातात ४३ भारतीय मालवाहू जहाजे अडकली, तेल टँकर होताहेत लक्ष्य; अनेक जहाजांनी मार्ग बदलले
मधुकर ठाकूर
लोकमत न्यूज नेटवर्क
उरण (जि. रायगड) : मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे होर्मुझची सामुद्रधुनी या महत्त्वाच्या सागरी मार्गावरील जहाज वाहतूक आठ दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी, ४३ भारतीय जहाजांसह सुमारे ३,२५० मालवाहू जहाजे आखातात अडकली आहेत. जागतिक पुरवठा साखळीवर त्याचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत.
या जहाजांपैकी सुमारे १,२३० जहाजे फक्त आखातातील मालवाहतुकीसाठी कार्यरत आहेत. भारतीय जहाजांवरील खलाशांच्या सुरक्षिततेसाठी मदत मिळावी, अशी मागणी इंडियन नॅशनल शिप ओनर्स असोसिएशनने केंद्र सरकारकडे केली आहे.
जगातील मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल या मार्गाने वाहून नेले जाते. या सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण असल्याने युद्धाच्या पार्श्वभूमीवर मार्ग बंद केला आहे. त्यामुळे कोणत्याही जहाजाला येथून मार्गक्रमण करणे सध्या जवळपास अशक्य झाले आहे.
तेल टँकर लक्ष्य; अनेक जहाजांनी मार्ग बदलले
सामुद्रधुनीत दहापेक्षा अधिक तेल टँकरना लक्ष्य करण्यात आल्याच्या बातम्यांनंतर अनेक जहाजांनी मार्ग बदलला. सुमारे ५०० जहाजे सध्या यूएई आणि ओमानच्या किनाऱ्यावरील यू बंदरांमध्ये मदतीची प्रतीक्षा
करत आहेत.
युद्धामुळे आखाती वायू व तेल पुरवठा विस्कळीत झाल्याने भारतासह युरोपमध्ये इंधन तुटवड्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक सुपरटँकर पर्शियन आखातातून माघारी वळत असून, काही जहाजे अटलांटिक किंवा लाल समुद्राच्या मार्गाने परत जात आहेत.
तेलाच्या दरात उसळी
तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात तेलाच्या किमतींमध्येही मोठी उसळी दिसून आली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल ९० डॉलर्सपेक्षा अधिक झाली असून, परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विमा कवच रद्द; शिपिंग कंपन्यांवर वाढतोय खर्चाचा दबाव
सागरी विमा कंपन्यांनी आखातातील युद्ध जोखीम कवच रद्द केल्याने शिपिंग कंपन्यांवर आर्थिक दबाव वाढला आहे. सध्या ६० हून अधिक तेल टँकर निष्क्रिय झाल्याने मोठा बॅकलॉग निर्माण झाला आहे.
मध्यपूर्वेतील कच्चे तेल लोड करण्यासाठी जहाजांची कमतरता भासत आहे. या संकटामुळे टँकरचे भाडे विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. वाढत्या जोखमीमुळे काही जहाज मालकांनी या प्रदेशापासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे शिपिंग डेटा विश्लेषक संस्थांनी नमूद केले आहे. विमा संरक्षण नाकारल्यामुळे मालवाहू जहाजांच्या परिचालन खर्चात २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. विमा कंपन्यांनी या क्षेत्राला ‘हाय रिस्क झोन’ जाहीर केल्याने नव्या करारांसाठी मोठा प्रीमियम घेतला जात आहे. तो छोट्या कंपन्यांना परवडणारा नाही. यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळली आहे.