तेहरान : इस्रायलबरोबर संघर्ष सुरू असतानाही इराणने आपल्या देशात अडकून पडलेल्या एक हजार भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी जाता यावे, यासाठी आपली हवाई हद्द खुली केली. भारताशी असलेल्या मैत्रीची जाणीव ठेवत इराणने युद्धाच्या धामधुमीत मानवतावादी निर्णय घेतला. त्याबद्दल या विद्यार्थ्यांनी इराणचे आभार मानले.
सध्या इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय विमानांना इराणच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यास बंदी आहे. मात्र, त्यास भारताचा अपवाद करण्यात आला. इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकार ‘ऑपरेशन सिंधू’ ही मोहीम राबवत आहे. त्याअंतर्गत १७ जून रोजी भारताच्या दूतावासाने इराणमधून ११० विद्यार्थ्यांना रस्त्याने आर्मेनियात नेले. तेथील येरेवन येथून १८ जून रोजी विशेष विमानाने हे विद्यार्थी भारतात रवाना झाले. इराण व इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणले जाणार आहे. अडकलेल्या भारतीयांना आता इराणमधील मशहद शहरातून भारतात आणले जाणार आहे.
इराणमधील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्याने सांगितले की, इराणमधील भारतीयांना आणण्यासाठी गरज पडल्यास सरकार आणखी विमान फेऱ्यांची व्यवस्था करणार आहे. तसेच, तुर्कमेनिस्तानच्या अश्गाबात शहरातूनही एक विमान भारतीयांना घेऊन दिल्लीला येणार आहे.
नेमके कधी परतणार विद्यार्थी मायदेशी? विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे एक विमान शुक्रवारी रात्रीपर्यंत भारतात पोहोचेल आणि शनिवारी दुपारपर्यंत दोन विमाने भारतात पोहोचतील. या उड्डाणांची व्यवस्था भारत सरकारने केली आहे. ही उड्डाणे इराणमधील मशहद येथून उड्डाण करतील आणि दिल्लीत उतरतील, अशी माहिती देण्यात आली आहे.
आतापर्यंत युद्धात किती झाले नुकसान?शुक्रवारी इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा आठवा दिवस होता. सकाळी इराणने इस्रायलच्या बेरशेबा शहरातील मायक्रोसॉफ्ट ऑफिसजवळ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला केला. यामुळे अनेक गाड्यांना आग लागली. आजूबाजूच्या घरांचेही नुकसान झाले. आतापर्यंतच्या युद्धात २४ इस्रायली मारले गेले आहेत, तर ६०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्याच वेळी, वॉशिंग्टनस्थित एका मानवाधिकार गटाने दावा केला आहे की, इराणमध्ये मृतांची संख्या आता ६३९ वर पोहोचली आहे आणि १,३२९ जखमी झाले आहेत.