चहावाल्याचा मुलगा MBA झाला, परदेशात नोकरीची ऑफर; १५ लाखांचे पॅकेज, वडील झाले भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 18:49 IST2025-06-02T18:48:35+5:302025-06-02T18:49:11+5:30
एकामागोमाग संकटे आली. सर्वसामान्य कुटुंब असताना आलेले प्रत्येक संकट मोठ्या डोंगराएवढे होते.

चहावाल्याचा मुलगा MBA झाला, परदेशात नोकरीची ऑफर; १५ लाखांचे पॅकेज, वडील झाले भावुक
संगमनेर -'संघर्षानंतर मिळणारे यश अधिक मौल्यवान आणि आनंददायक असते.' असे सांगताना संगमनेर शहरातील चहाविक्रेते दीपक साळुंके भावुक झाले होते, त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. त्याला कारणही तसेच आहे. त्यांचा मुलगा प्रज्वल याने व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी (एमबीए) संपादन केली, त्याची आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीमध्ये १५ लाख रुपये इतक्या भरघोस वार्षिक पॅकेजवर सेंट किटस अॅण्ड नेव्हिस या कॅरिबियन बेटावर नोकरीसाठी निवड झाली.
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या एमबीए महाविद्यालयातून प्रज्वल साळुंके याने व्यवसाय व्यवस्थापनात फायनान्समधून पदव्युत्तर पदवी संपादन केली. दीपक साळुंके चहाविक्रेते असून त्यांची शहरातील नवीन नगर रस्त्याच्या कडेला छोटीशी टपरी आहे. कष्टकरी असलेल्या साळुंके कुटुंबात दीपक साळुंके यांची पुतणी चैताली संतोष साळुंके ही आयटी क्षेत्रातील उच्चशिक्षित. अतिशय संघर्षातून चैताली आणि प्रज्वल या बहीण-भावाने हे यश मिळवले. २०१४ मध्ये दीपक साळुंखे यांना ब्रेन ट्यूमर झाला होता, त्याचवर्षी त्यांच्या कन्येचे आणि वडिलांचे निधन झाले. एकामागोमाग संकटे आली. सर्वसामान्य कुटुंब असताना आलेले प्रत्येक संकट मोठ्या डोंगराएवढे होते. साळुंखे यांच्या डोक्याच्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या, आजारातून ते सुखरूप बाहेर पडले. दोन्ही भावांनी आणि मित्रांनी मला साथ दिल्याचेही साळुंके अभिमानाने सांगतात.
त्यानंतर पुन्हा व्यवसाय सुरू केला. प्रज्वल हा मराठी शाळेत शिक्षण घेत असताना कुटुंबांवर आलेले संकट पाहून तो अतिशय कमी वयातच मला मदत करायचा. शिक्षण पूर्ण करताना त्याने सीएकडे सहा वर्ष नोकरीही केली. परिस्थितीतून मुलगा घडला त्यातून त्याने उच्चशिक्षण घेतले, चांगली नोकरीही मिळविली आणि तो विमानाने जातो आहे, हे सांगताना चहावाल्या साळुंखे यांना आनंद झाला होता.
प्रज्वल साळुंके सांगतो..
अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकास होतो. महाविद्यालयामध्ये नियमित वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, मॉक इंटरव्ह्यू असे अनेक उपक्रम घेतले जातात. अमृत ट्रॉफीचे माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व, बिझनेस क्वीज, बिझनेस स्कील, मॅनेजमेंट या विषयावरील मार्गदर्शन आदी उपक्रम राबविले जातात. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये समन्वय, नेतृत्व, कौशल्य यांची वाढ होते, यातून मी घडलो. माझ्या यशात शिक्षकांचे, कुटुंबीयांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे.