Tokyo Olympics: भारताच्या महिला हॉकी संघाचे आनंद महिंद्रांनी केले खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 13:14 IST2021-08-06T13:13:57+5:302021-08-06T13:14:15+5:30
Tokyo Olympics Updates: टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाला कांस्यपदकाने हुलकावणी दिली असली तरी भारतीय संघाच्या कामगिरीचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे. दरम्यान, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ट्विटसाठी प्रसिद्ध असलेल्या उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी भारतीय महिला संघाचे खास शब्दांत कौतुक केले आहे.

Tokyo Olympics: भारताच्या महिला हॉकी संघाचे आनंद महिंद्रांनी केले खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने जबरदस्त खेळ केला. मात्र आज झालेल्या रोमांचक उपांत्य फेरीच्या लढतीत भारतीय महिला संघाला ग्रेट ब्रिटनच्या संघाकडून ३-४ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला संघाला कांस्यपदकाने हुलकावणी दिली असली तरी भारतीय संघाच्या कामगिरीचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे. दरम्यान, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ट्विटसाठी प्रसिद्ध असलेल्या उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी भारतीय महिला संघाचे खास शब्दांत कौतुक केले आहे.
भारतीय महिला संघाने याआधी आपली सर्वोत्तम कामगिरी १९८० मध्ये केली होती. त्यावेळी भारतीय महिला संघाने चौथे स्थान पकावले होते. भारतीय महिला संघाचे कौतुक करताना आनंद महिंद्रा आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, आज आम्ही अंडरडॉग्सना गुरुगुरताना पाहिले. आता त्यांचीही वेळ येईल. त्यांनी एका अशा क्रांतीला सुरुवात केली आहे जिला आता रोखता येणार नाही.
सामन्यातील पहिल्या क्वार्टरमध्ये ब्रिटनच्या संघाने आक्रमक खेळ केला. यादरम्यान, ब्रिटीश संघाला काही पेनल्टी कॉर्नरही मिळाले. मात्र भारतीय गोलरक्षक सविता पुनिया आणि बचाव फळीने भक्कम बचाव करत ब्रिटीश आक्रमणाला थोपवून धरले. त्यामुळे पहिल्या क्वार्टरच्या अखेरीस गोलफलक ०-० अशा बरोबरीत राहिला.मात्र दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच ब्रिटिश खेळाडूंनी भारतीय बचावफळी भेदत जोरदार मुसंडी मारली. दुसऱ्या क्वार्टरमधील पहिल्याच मिनिटाला एलेना रायरने गोल करत ग्रेट ब्रिटनने गोल करून १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर सारा रॉबर्टसनने केलेल्या गोलच्या जोरावर ब्रिटनने आपली आघाडी २-० अशी वाढवली. मात्र ०-२ अशा पिछाडीवर पडलेल्या भारतीय महिला संघाने सामन्यात जोरदार पुनरागमन केले. गुरजित कौरने भारताला मिळालेल्या दोन पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल करत भारताची पिछाडी भरून काढत संघाला २-२ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर मध्यांतराला काही वेळ बाकी असताना २९ व्या मिनिटाला वंदना कटारियाने ब्रिटनचा बचाव भेदत गोल केला आणि भारताला ३-२ ने आघाडी मिळवून दिली.
मध्यांतरानंतरच्या खेळात ग्रेट ब्रिटनने पुन्हा एकदा जोरदार आक्रमण केले आणि सामन्यात बरोबरी साधली. दरम्यान, तिसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या काही सेकंदात भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र त्याचा भारताला फायदा घेता आला नाही. त्यानंतर चौथ्या आणि निर्णायक क्वार्टरमध्ये ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूंनी आक्रमणाची धार वाढवत भारतावर दबाव आणला आणि सामन्यातील ४८ व्या मिनिटाला गोल करून ग्रेट ब्रिटनने सामन्यातर ४-३ अशी आघाडी घेतली.