दहावीत ९१ टक्के पण आता मोबाइलमध्ये गुंग; पालकांनी बोलताच एकुलत्या एक मुलाने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 15:50 IST2026-05-16T15:45:17+5:302026-05-16T15:50:02+5:30
''जास्त मोबाइल पाहू नको'', पालकांनी म्हणताच एकुलत्या एक मुलाने संपवले जीवन

दहावीत ९१ टक्के पण आता मोबाइलमध्ये गुंग; पालकांनी बोलताच एकुलत्या एक मुलाने संपवले जीवन
आखाडा बाळापूर: नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात ९१ टक्के गुण मिळवून कुटुंबाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याने किरकोळ कारणावरून रागाच्या भरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कळमनुरी तालुक्यातील बिबथर येथे घडली आहे. शिवम गोविंद शिंदे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून त्याच्या या टोकाच्या पावलामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
नेमका काय घडला प्रसंग?
गोविंद शिंदे हे आपल्या कुटुंबासह बिबथर येथे राहतात. त्यांना दोन मुली आणि शिवम हा एकुलता एक मुलगा होता. शिवम हिंगोली येथील शाळेत शिकत होता आणि सध्या सुट्ट्यांमुळे गावाकडे आला होता. शुक्रवार, १५ मे रोजी दुपारी शिवमने मोबाईल घेण्यासाठी हट्ट धरल्याने कुटुंबाने त्याला पैसे दिले. तो आखाडा बाळापूर येथून नवीन मोबाईल घेऊन सायंकाळी ५ वाजता घरी परतला.
रागात खोलीत निघून गेला अन्
"एवढा महागडा मोबाईल कशाला घेतलास? आता सारखा मोबाईल पाहू नको, अभ्यास कर," असे कुटुंबातील सदस्यांनी त्याला सहज म्हटले. मात्र, या गोष्टीचा शिवमला तीव्र राग आला. त्याने घरात जाऊन एका खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला आणि गळफास लावला. बराच वेळ तो बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा तोडून पाहिले असता हा थरार समोर आला.
रुग्णालयात मयत घोषित
त्याला तातडीने आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. शनिवार, १६ मे रोजी सकाळी त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी (Post Mortem) करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुठ्ठे आणि पथकाने रुग्णालयात जाऊन पाहणी केली. अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या मुलाने अशा प्रकारे जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.