हिंगोलीत राजकीय भूकंप: भाजप प्रवेशासाठी दांडेगावकर ५०० गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 18:05 IST2026-02-25T18:02:54+5:302026-02-25T18:05:47+5:30
वसमतच्या राजकारणात मोठा उलटफेर; आतिश दांडेगावकरांच्या 'मेगा' भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा

हिंगोलीत राजकीय भूकंप: भाजप प्रवेशासाठी दांडेगावकर ५०० गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईकडे
वसमत (हिंगोली): आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे चिरंजीव आणि कपिश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष आतिश दांडेगावकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी (२६ फेब्रुवारी) मुंबईत होणाऱ्या भव्य सोहळ्यात ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे 'कमळ' हाती घेणार आहेत.
५०० गाड्यांचा ताफा आणि शक्तिप्रदर्शन
बुधवारी सकाळी आतिश दांडेगावकर यांनी आपल्या आई-वडिलांचे आशीर्वाद घेऊन मुंबईकडे प्रस्थान केले. यावेळी वसमतमधून तब्बल ५०० गाड्यांचा प्रचंड ताफा आणि हजारो कार्यकर्ते त्यांच्यासोबत रवाना झाला. कार्यकर्त्यांनी केलेल्या जोरदार आतिषबाजीने संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. मुंबईत कोकण भवन येथे होणाऱ्या या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
राजकीय समीकरणे बदलणार
आतिश दांडेगावकर यांच्या भाजप प्रवेशामुळे वसमत विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठी ताकद मिळणार आहे. विशेष म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप दांडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची दाट शक्यता आहे. यामुळे मतदारसंघातील प्रस्थापित राजकीय गणिते पूर्णपणे बदलणार असल्याचे बोलले जात आहे.
मार्चमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा
दरम्यान, मार्च महिन्यात वसमत येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित केली जाणार आहे. या सभेत केवळ दांडेगावकरच नव्हे, तर जिल्ह्यातील इतरही अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. दांडेगावकरांच्या या 'मेगा एन्ट्री'ने विरोधकांच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.