वसमतच्या विकासातील ऐतिहासिक टप्पा! 'सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजने'ला प्रशासकीय मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 18:59 IST2026-03-04T18:57:25+5:302026-03-04T18:59:03+5:30
आ. राजू नवघरेंचा पाठपुरावा यशस्वी; सिद्धेश्वर योजनेमुळे ४ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली, २५ गावांना फायदा

वसमतच्या विकासातील ऐतिहासिक टप्पा! 'सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजने'ला प्रशासकीय मंजुरी
- इस्माईल जहागीरदार
वसमत (जि. हिंगोली): गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि वसमत विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजने'ला अखेर प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. आमदार राजू नवघरे यांच्या अथक परिश्रमांना आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले असून, यामुळे वसमत आणि औंढा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे स्वप्न साकार होणार आहे.
सिंचन अनुशेष भरून निघणार
हिंगोली जिल्हा हा राज्यपाल सिंचन अनुशेषात मोडतो. हा अनुशेष भरून काढण्यासाठी आ. नवघरे यांनी शासन स्तरावर लढा दिला होता. या योजनेमुळे वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, अंबा, शिरडशहापूर आणि पुरजल सर्कल मधील २५ पेक्षा अधिक गावांना, तर औंढा तालुक्यातील १५ गावांना थेट फायदा होणार आहे. यामुळे साधारण ३ ते ४ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून शेती उत्पादनात मोठी वाढ अपेक्षित आहे.
अजित पवारांचे मोलाचे सहकार्य
या योजनेच्या मंजुरीसाठी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मंत्रालयात त्यांच्या उपस्थितीत झालेल्या अनेक बैठका आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळेच हा प्रकल्प मार्गी लागला आहे. यापूर्वीही आ. नवघरे यांच्या प्रयत्नातून पूर्णा नदीवरील पोटा, पिंपळगाव कुटे आणि परळी दथरथे येथील बंधाऱ्यांना मंजुरी मिळाली होती, ज्यांची कामे आता प्रगतीपथावर आहेत.
आमदार राजू नवघरे भावूक
"शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी त्यांच्या शेतापर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय होते. सिद्धेश्वर योजनेमुळे वसमतचा कायापालट होईल. मात्र, आज हा आनंद पाहायला 'दादा' आपल्यात नाहीत, याची मोठी खंत वाटते," अशा भावना आमदार राजू नवघरे यांनी यावेळी व्यक्त केल्या.