Hingoli: मावस भावाशी लग्नाला विरोध करणाऱ्या मुलीचा खून करून पित्याने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 20:16 IST2025-08-22T20:16:05+5:302025-08-22T20:16:35+5:30
शहरातील मस्तानशाह नगर येथे २० ऑगस्ट रोजी वडील आणि मुलीचा मृतदेह आढळला होता.

Hingoli: मावस भावाशी लग्नाला विरोध करणाऱ्या मुलीचा खून करून पित्याने संपवले जीवन
हिंगोली : मावस भावाशी लग्न करण्यास मुलीचा विरोध असल्याने पित्याने मुलीचा खून करून नंतर स्वत: आत्महत्या केल्याचा प्रकार हिंगोली शहर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनंतर समोर आला आहे. या प्रकरणात मयत पित्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील मस्तानशाह नगर येथे २० ऑगस्ट रोजी वडील आणि मुलीचा मृतदेह आढळला होता. सय्यद साकेर आणि त्यांची मुलगी मंतशानाज सय्यद साकेर अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने खळबळ उडाली होती. दोघांच्याही मृत्यूचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. या प्रकरणात २० ऑगस्ट रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास दाखल फिर्यादीनंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे.
सय्यद जाकीर सय्यद जाफर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सय्यद शाकेर यांची मुलगी मंतशानाज हिची सोयरीक तिच्या मावशीच्या मुलासोबत झाली होती. परंतु, मुलीला मावशीचा मुलगा पसंत नव्हता. त्यामुळे घरात काही दिवसांपासून वाद होता. त्यातूनच २० ऑगस्ट रोजी मध्यरात्री २:३० वाजण्यापूर्वी सय्यद साकेर याने त्याची मुलगी मंतशानाज हिच्या तोंडावर उशी ठेवून तिचा खून केला. या गोष्टीचा मनस्ताप होऊन त्याने स्वत:च्या छातीवर चाकूने वार करून डाव्या हाताच्या मनगटाजवळील नस चाकूने कापून घेतली. त्यानंतरही त्याचा जीव जात नसल्याने स्वत: गळफास घेऊन स्वत:च्या मरणास कारणीभूत ठरला, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक आनंद बनसोडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.