विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्या नराधम मुख्याध्यापकाला कारावास; हिंगोली पोक्सो न्यायालयाचा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 14:49 IST2026-02-24T14:49:02+5:302026-02-24T14:49:37+5:30
हा महत्त्वपूर्ण निकाल २३ फेब्रुवारी रोजी जिल्हा न्यायाधीश एस. एन. माने - गाडेकर यांनी सुनावला.

विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्या नराधम मुख्याध्यापकाला कारावास; हिंगोली पोक्सो न्यायालयाचा निकाल
आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना नवोदय तसेच स्कॉलरशिप परीक्षेसाठी सुटीच्या दिवसांत शिकवणी घेण्यासाठी बोलावून एकांतात अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकाला न्यायालयाने ५ वर्षे सश्रम कारावास आणि ७५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. हा महत्त्वपूर्ण निकाल २३ फेब्रुवारी रोजी जिल्हा न्यायाधीश एस. एन. माने - गाडेकर यांनी सुनावला.
एका जि. प. शाळेतील ६ विद्यार्थिनी व ३ विद्यार्थी नवोदय आणि स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करत होते. त्यादरम्यान उन्हाळी सुट्ट्यांमध्ये तत्कालीन मुख्याध्यापक भगवान पंडितराव अवचार हे विद्यार्थ्यांना शिकवणी द्यायचे. त्यावेळी एकेका मुलीस वैयक्तिकरीत्या स्टोअर रूममध्ये बोलावून मुख्याध्यापक त्यांच्या सोबत अश्लील कृत्य करत असत, अशा आशयाची फिर्याद १७ ऑगस्ट २०२२ रोजी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यानुसार कलम ३५४, ५०६ व बाल लैंगिक अत्याचार कायदा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी यतीश देशमुख, विवेकानंद वाखारे, किशोर कांबळे, बाळापूर ठाण्याचे ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांनी केला. तपासाअंती जिल्हा न्यायालयहिंगोली येथे दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी २३ फेब्रुवारी रोजी जिल्हा न्यायाधीश एस. एन. माने - गाडेकर यांनी निवाडा केला असून दाखल तिन्ही प्रकरणांमध्ये आरोपी तत्कालीन मुख्याध्यापक भगवान पंडितराव आवचार यास दोषी ठरवले.
कलम ३५४ मध्ये ५ वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावास, कलम ५०६ मध्ये १ वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड तसेच कलम ११ पोक्सोमध्ये ३ वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंड अशाप्रकारे एकूण तिन्ही प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावली. सर्व शिक्षा एकत्र भोगण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. एन. एस. मुटकुळे यांनी अंतिम युक्तिवाद केला. सहायक सरकारी वकील एस. डी. कुंटे, सविता देशमुख यांनीही सहकार्य केले.