विनवणीनंतरही कारखान्याने ऊस नेला नाही, डीपीवरील ठिणगीमुळे १२ एकरांतील ऊसाची राख
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 19:33 IST2025-12-22T19:32:27+5:302025-12-22T19:33:26+5:30
औंढा नागनाथ तालुक्यातील पुरजळ शिवारातील घटना

विनवणीनंतरही कारखान्याने ऊस नेला नाही, डीपीवरील ठिणगीमुळे १२ एकरांतील ऊसाची राख
औंढा नागनाथ : शेतातील वीजरोहित्रातून उडालेल्या ठिणगीमुळे तब्बल १२ एकरांतील ऊस जळून खाक झाल्याची घटना २० डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
पुरजळ भागात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली असून, हा ऊस सध्या तोडणीसाठी उपलब्ध झाला आहे. रविवारी शेतशिवारात उभ्या वीजरोहित्रात स्पार्किंग होऊन ठिणगी पडली आणि काही क्षणांतच परिसरातील उसाने पेट घेतला. उसाच्या शेतातील आग आणि धुराचे लोट दिसताच शेतकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाळलेल्या उसाचे पाचट अधिकच पेट घेत होते. या आगीत शेत गट क्रमांक ८ मध्ये शेतकरी इर्शाद आलम यांचा ९ एकरांतील, तर सरताज आलम यांचा ३ एकरांतील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. यामध्ये दोन्ही शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. शासनाने या नुकसानीची तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
उशिरा पोहोचले अग्निशमनचे वाहन
शेतातील उभ्या उसाला लागलेली आग अटोक्यात आणण्याचा शेतकरी प्रयत्न करीत होते. यादरम्यान जवळा बाजार पोलिस चौकीसह औंढा नागनाथ येथील अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. मात्र, अग्निशमन दल उशिराने पोहोचल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
काही क्षणांतच पसरली वाळलेल्या पाचटामुळे आग
उसाचे पाचट वाळले असून, या पाचटामुळे काही क्षणांतच आग पसरत गेली. शेतकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग अधिकच भडकत होती.
दोन महिन्यांपासून ऊस नेण्यासाठी विनवणी
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार परिसरातील कपिलेश्वर शुगर मिलकडे शेतकऱ्यांनी ऊस न्यावा, यासाठी दोन महिन्यांपासून विनंती केली. मात्र, या कारखान्याने वेळकाढू धोरणाचा अवलंब करीत ऊस नेला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावरून शेतकऱ्यांत संतापाचा सूर उमटत होता.