पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 12:38 IST2026-04-12T12:37:43+5:302026-04-12T12:38:30+5:30
Health Tips: पाणी हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असून, उत्तम आरोग्याचा खरा पाया मानला जातो. शरीराच्या जवळपास सत्तर टक्के भागात पाणी असते. त्यामुळे शरीरातील प्रत्येक क्रियेत पाण्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते, पचनक्रिया सुरळीत ठेवते आणि त्वचा निरोगी राखण्यास मदत करते.

पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
- डॉ. रेणू सिंह - मोकाशी
(सदस्य, मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी, इंडिया
पाणी हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असून, उत्तम आरोग्याचा खरा पाया मानला जातो. शरीराच्या जवळपास सत्तर टक्के भागात पाणी असते. त्यामुळे शरीरातील प्रत्येक क्रियेत पाण्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते, पचनक्रिया सुरळीत ठेवते आणि त्वचा निरोगी राखण्यास मदत करते. रोज पुरेसे पाणी न प्यायल्यास थकवा, डोकेदुखी, बद्धकोष्ठता आणि मूत्रविकारांसारख्या तक्रारी उद्भवू शकतात. दीर्घकाळ पाण्याची कमतरता राहिल्यास किडनीवरही ताण येऊ शकतो.
शरीराला किती पाण्याची गरज?
दिवसातून किमान सात ते आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक असले, तरी ही गरज व्यक्तीच्या वय, कामाची पद्धत आणि हवामानानुसार बदलू शकते.
लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी पाण्याचे सेवन जाणीवपूर्वक करणे अधिक गरजेचे असते.
उन्हाळ्यात किंवा श्रमाचे काम करताना शरीरातून घामाद्वारे अधिक पाणी बाहेर पडते, अशावेळी पाण्याचे प्रमाण वाढवणे गरजेचे असते.
तहान लागण्याची वाट न पाहता थोड्या-थोड्या वेळाने पाणी पिणे ही चांगली सवय आहे.
कसे प्यावे? थंड की गरम?
अनेक जणांना फ्रिजमधील अतिथंड पाणी पिण्याची सवय असते. मात्र, असे पाणी पचनसंस्थेला त्रास देऊ शकते आणि घसा दुखणे किंवा सर्दी होण्याची शक्यता वाढते.
साधारण तापमानाचे किंवा मातीच्या मडक्यातील पाणी शरीरासाठी अधिक उपयुक्त ठरते. मडक्यातील पाणी नैसर्गिकरीत्या थंड राहते आणि पचनास
हलके असते.
तसेच उकळून थंड केलेले पाणी पिण्याची सवय केल्यास जंतुसंसर्ग व पाण्यातून होणारे आजार टाळता येतात.
सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिल्याने शरीराची स्वच्छता होते आणि पचनक्रिया सुधारते.
पाणी स्वच्छ अन् सुरक्षित हवे...
पाणी पिताना स्वच्छतेकडेही तितकेच लक्ष देणे आवश्यक आहे. दूषित पाणी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकते. पाणी पिण्यासाठी स्वच्छ भांडी वापरणे, पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवणे आणि शक्य असल्यास फिल्टर किंवा उकळण्याची प्रक्रिया अवलंबणे उपयुक्त ठरते.
स्वच्छ, सुरक्षित आणि योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने अनेक आजारांपासून संरक्षण मिळते. त्यामुळे औषधांपेक्षा पाण्यालाच पहिले औषध मानणे अधिक योग्य ठरते. पाणी हेच उत्तम आरोग्याचे मूळ आणि जीवनशक्तीचे प्रमुख साधन आहे.