‘तशा’ हातांनी खाऊ नका, डॉक्टरकडे उगाच जाऊ नका...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 11:31 IST2026-03-22T11:31:06+5:302026-03-22T11:31:14+5:30
आपण जन्मल्यानंतर मरेपर्यंत खूप वेळा पोटाच्या अनारोग्याला बळी पडतो.

‘तशा’ हातांनी खाऊ नका, डॉक्टरकडे उगाच जाऊ नका...
प्रा. डॉ. अरविंद देशमुख, अध्यक्ष, मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी, इंडिया
आपण जन्मल्यानंतर मरेपर्यंत खूप वेळा पोटाच्या अनारोग्याला बळी पडतो. याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या तोंडाद्वारे रोग निर्माण करणारे जीवाणू पोटात शिरतात. परिणामी, मळमळ, ताप, उलट्या, जुलाब, आतड्याला सूज आदी लक्षणे दिसतात. याबरोबरच अचानक शरीरातले पाणी कमी होते आणि प्रचंड पोटदुखी होते; आणि मग आपल्याला डॉक्टरकडे जावे लागते.
पावसाळ्यात किंवा प्रवासात ही शक्यता जास्त असते. पण, आपण घरच्या घरी योग्य काळजी घेतली तर पोटाच्या विकारांपासून दूर राहू शकतो. काविळ, टायफॉइड, कॉलरा, डिसेंट्री यांसारखे आजार हे प्रदूषित पाणी किंवा प्रदूषित अन्न पोटात गेल्यामुळेच होतात. हे टाळण्यासाठी आपल्याला घरच्या घरी योग्य काळजी घेता येते आणि आपण निरोगी आणि आनंदी राहू शकतो.
कशी घ्यावी घरच्या घरी काळजी?
हाताच्या बोटांची वाढलेली नखे काढण्याबाबत लहान मुलांना हे माहीत नसते. मुले मैदानात किंवा अस्वच्छ जागेत खेळतात. त्यांच्या वाढलेल्या नखांमध्ये घाण तशीच राहते आणि जेवताना ती पोटात जाऊ शकते. परिणामी, अनेक रोगांना आमंत्रण मिळू शकते. म्हणून नखे वेळोवेळी काढणे, स्वच्छ करणे आरोग्यासाठी हितकारक आहे.
जेवण करण्यापूर्वी किंवा हाताने काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुण्याच्या सवयीमुळे आतड्याचे अनेक रोग टाळता येतात.
हॅण्डवॉशचा वापर केला असल्यास स्वच्छ पाण्याने नीट हात धुणे आवश्यक आहे. अन्यथा हॅण्डवॉशमधली रसायने पोटात जाण्याची शक्यता अधिक असते.
पावसाळ्याचे चार महिने पाणी उकळून थंड करून प्यायल्यास अनेक रोग टाळता येतात. हे लक्षात घ्या की, कोणत्याही दवाखान्यात पावसाळ्यात रुग्णांची गर्दी असते.
अन्न पदार्थ शिजविल्यानंतर फ्रीजबाहेर जास्त वेळ राहिल्यास असे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. कारण त्यामध्ये जंतूंचा संसर्ग झाला असण्याची शक्यता जास्त असते.