नोटीसला न जुमानणाऱ्यांची आता थेट तुरुंगात रवानगी ! नवीन कायद्यानुसार प्रतिबंधक कारवाया
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 19:23 IST2026-02-21T19:20:35+5:302026-02-21T19:23:09+5:30
Gondia : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांचे एक पाऊल पुढे आहे. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांना तडीपार व अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीएसारख्या कारवाया केल्या गेल्या.

Those who do not heed the notice will now be sent directly to jail! Preventive measures under the new law
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांचे एक पाऊल पुढे आहे. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांना तडीपार व अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीएसारख्या कारवाया केल्या गेल्या. पोलिसांनी प्रतिबंधक कारवायांत गुन्हेगाराला नोटीस पाठविल्यावर त्या नोटीसला प्रतिसाद दिला जात नव्हता. त्यामुळे पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी नोटीसला न जुमानणाऱ्या गुन्हेगारांना सरळ आता तुरुंगवारी घडविण्याचा नवीन उपक्रम सुरू केला आहे.
नवीन कायद्याची सुरुवात झाली तेव्हापासून आतापर्यंत सहा गुन्हेगारांना तुरुगात पाठविले आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आहे. गुन्ह्यांचा तपास करण्याची गती झपाट्याने वाढविल्याने उघडकीस आलेल्या गुन्ह्यांची टक्केवारी ७० ते ८० च्या घरात आहे.
जिल्ह्यातील आणखी गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई सुरूच आहे. जिल्हा पोलिस दलातील सर्व पोलिस ठाणेदार याशिवाय स्थानिक गुन्हे शाखा, नेमलेली विशेष पथके यांच्याकडून दररोज गस्त, छापा, धडक कारवाई करून अवैध व्यवसायाला लगाम लावला जात आहे. पेट्रोलिंगच्या माध्यमातून सुद्धा अजून करडी नजर ठेवून अवैध व्यवसाय समोर आल्यास थेट कारवाई होणार आहे. अवैध व्यवसाय सुरू राहू नयेत, यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. दररोज वेगवेगळ्या भागात प्रतिबंधात्मक कारवाई, अवैध दारू विक्री, जुगार अशा प्रकरणांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, महाराष्ट्र पोलिस कायदा, शिवाय दारूबंदी आणि जुगारसोबतच विविध ठिकाणी पाहिजे असलेले गुन्हेगार, फरार आरोपी अशा सर्व जणांवर योग्य त्या प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्या आहेत.
१६७ जणांचे अंतरिम बंदपत्र केले रद्द
अंतरिम बंदपत्राचा भंग केल्यामुळे कलम १२६ अंतर्गत ७४ जणांवर तर कलम १२९ अंतर्गत २३ जणांचा बंदपत्र रद्द करून त्यांच्याकडून ८ लाख १० हजार रुपये वसुल करून शासन जमा केले आहे.
२२७१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, महाराष्ट्र पोलिस कायदा, शिवाय दारूबंदी आणि जुगारसोबतच विविध ठिकाणी पाहिजे असलेले गुन्हेगार, फरार आरोपी अशा २२७१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यात कलम १२६ अंतर्गत १७६४ जणांवर तर कलम १२९ अंतर्गत ५०७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
१८५१ जणांनी जणांनी घेतले होते बंदपत्र
गोंदिया जिल्ह्यातील १८५१ गुन्हेगारांनी बंदपत्र घेतले होते. त्या बंदपत्रचा भंग करणाऱ्यांना दंड आकारण्यात आला आहे.
"गुन्हेगारांच्या प्रवृत्तीस आळा घालण्यासाठी व समाजात शांतता व सुव्यवस्था नांदविण्यासाठी अट्टल गुन्हेगारांना तडीपार केले. प्रतिबंधक कारवाईत आधी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे पेशी असायची परंतु बीएसएननुसार आता पोलिस अधीक्षकांकडे पेशी लावली जाते. नोटीस बाजवूनही हजर न झालेल्या सहा जणांना तुरुंगात पाठविले आहे."
- गोरख भामरे, पोलिस अधीक्षक, गोंदिया.