आतापर्यंत लॉकडाऊनचा ४६११ वाहन चालकांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST2020-04-20T05:00:00+5:302020-04-20T05:00:09+5:30
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २२ मार्चला जनतेचा कर्फ्यू करण्यात आला. परंतु २३ मार्चपासून केंद्र व राज्य सरकाने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन केला आहे. लॉकडाऊनमध्येही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्यामुळे त्यांच्यावर वाहतूक नियमान्वये कारवाई करून दंड वसूल करण्याची मोहीम जिल्हा वाहतूक शाखेने सुरू केली आहे.

आतापर्यंत लॉकडाऊनचा ४६११ वाहन चालकांना दणका
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कारोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. मात्र यानंतरही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्याने जिल्हा वाहतूक पोलिसांनी २३ मार्च ते १८ एप्रिलच्यापर्यंत ४ हजार ६११ वाहन चालकांना दंड आकारून त्यांच्याकडून ९ लाख ५३ हजार ६०० रूपये दंड वसूलही केला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २२ मार्चला जनतेचा कर्फ्यू करण्यात आला. परंतु २३ मार्चपासून केंद्र व राज्य सरकाने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन केला आहे. लॉकडाऊनमध्येही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्यामुळे त्यांच्यावर वाहतूक नियमान्वये कारवाई करून दंड वसूल करण्याची मोहीम जिल्हा वाहतूक शाखेने सुरू केली आहे. विनाकारण रस्त्यावर येणाऱ्या अश्या ४ हजार ६११ लोकांना २३ मार्च ते १८ एप्रिल या काळात दंड करण्यात आला आहे.
चारचाकी किंवा दुचाकी वाहन चालक रस्त्यावर फिरू नयेत म्हणून पोलिसांनी कायद्याची कडक अमंलबजावणी सुरू केली आहे. विनाकारण एखादा व्यक्ती रस्त्यावर आढळला व पोलिसांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास त्या वाहन चालकाला थांबवून त्याच्या वाहनात किंवा वाहन चालवितांना कोणत्या ना कोणत्या तृट्या दाखवून पोलीस कारवाई करीत आहेत. लॉकडाऊनमुळे वाहतूक पोलीस आणखीच कडक नियम लावून कारवाई करीत आहे. हे कडक नियम कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उचललेले योग्य पाऊल आहे. २३ मार्चपासून कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे.
दुचाकी, चारचाकी अशा ४ हजार ६११ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ९ लाख ५३ हजार ६०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. लॉकडाऊनचे पालन व्हावे हा एकमेव या मागील उद्देश आहे. रस्त्यावरून येणाºया-जाणाºया प्रत्येक वाहनाची कसून चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. कारण नसताना वाहन रस्त्यावर आले की त्या वाहनाला दंड कसा करायचा याच्याच प्रयत्नात वाहतूक पोलीस दिसत आहेत. हे जरी वाहन चालकांना योग्य वाटत नसले तरी आजघडीला वाहतूक पोलिसांकडून करण्यात येणारी ही कारवाई समाजाच्या हिताची आहे. दंडामुळे विनाकारण लोक रस्त्यावर येणार नाहीत आणि कोरोनाच्या लढाईत सर्व जिंकतील हा या मागील उद्देश आहे.
चार दिवसात २.२३ लाख वसूल
१५ ते १८ एप्रिलच्या दुपारपर्यंत या लॉकडाऊनच्या काळात १०६६ वाहनांवर दंड आकारण्यात आला. परंतु मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात कारवाई करायला पोलिसांनी सुरूवात केली आहे. या चार दिवसात २ लाख २२ हजार ९०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.
५५० वाहन जप्त
पोलिसांनी मोटारवाहन कायद्यांतर्गत ५५० वाहन जप्त केली होती. त्या सर्व वाहनांची कागदपत्रे तपासल्यानंतर त्यांना दंड आकारून सोडण्यात आले आहेत.
सद्या कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरीता नागरिकांनी अति महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये. सर्वांनी आपली नैतिक जबाबदारी पार पाळावी. घरातच राहून सहकार्य करावे. वारंवार समजावूनही विनाकारण रस्त्यावर येणाºया वाहन चालकांना दंड आकारावाच लागेल.
- दिनेश तायडे, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा गोंदिया.