लॉकडाऊन वाढू न देणे हे आता सर्वस्वी जनतेच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:00 IST2020-04-16T05:00:00+5:302020-04-16T05:00:29+5:30

जिल्हाधिकारी बलकवडे म्हणाल्या, गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्या. तसेच नागरिकांनी देखील याला सहकार्य केल्याने जिल्ह्यात एकही नवीन कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. तर कोरोना बाधीत रुग्ण देखील आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे सध्या स्थितीत जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्ण नाही. शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढविला आहे.

Lockdown is now in the hands of the general public | लॉकडाऊन वाढू न देणे हे आता सर्वस्वी जनतेच्या हातात

लॉकडाऊन वाढू न देणे हे आता सर्वस्वी जनतेच्या हातात

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : २० एप्रिलनंतर होणार शिथिलता आणण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देशात आणि राज्यात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र सुदैवाने गोंदिया जिल्ह्यात आता एकही कोरोना बाधीत रुग्ण नाही. तर केंद्र शासनाने २० एप्रिलनंतर काही जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याचे निर्देश दिले आहे. मात्र यावरील अंतीम निर्णय हा २० एप्रिलनंतरच होणार असून नागरिकांनी प्रशासनाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील नागरिक जेवढ्या कठोरपणे या निर्णयाचे पालन करतील तेवढीच मदत जिल्हा कोरोना मुक्त ठेवण्यासाठी होईल. एकंदरीत लॉकडाउनचा कालावधी वाढू न देणे हे सर्वस्वी जतनेच्या हातात असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी बुधवारी (दि.१५) येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
पत्रकार परिषदेला जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. व्ही. पी. रूखमोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजीव दोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी देवचंद वानखेडे, न.प.मुख्याधिकारी चंदन पाटील उपस्थित होते.
जिल्हाधिकारी बलकवडे म्हणाल्या, गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्या. तसेच नागरिकांनी देखील याला सहकार्य केल्याने जिल्ह्यात एकही नवीन कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. तर कोरोना बाधीत रुग्ण देखील आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे सध्या स्थितीत जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्ण नाही. शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढविला आहे. तर २० एप्रिलपासून काही जिल्ह्यात थोड्याफार प्रमाणात काही गोष्टींसाठी सवलत देण्याची शक्यता आहे. यामध्ये कृषी विषयक कामे, मनरेगाची कामे आणि छोट्या उद्योगांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
मात्र लॉकडाऊनमध्ये काही सुट दिल्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घालून देण्यात आलेली बंधने ही कायम राहतील. त्यामुळे नागरिकांनी शासनाच्या दिशा निर्देशांचे काटेकोरपणे पालन करुन कोरोनाला हद्दपार करण्याची गरज असल्याचे बलकवडे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढू न देणे हे पूर्णपणे जनतेच्या हाती आहे.

जिल्ह्यात अन्नधान्याचा तुटवडा नाही
लॉकडाऊनच्या कालावधी गोरगरीब व गरजू कुटुंबांची परवड होवू नये यासाठी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून बीपीएल व अंत्योदय योजना आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत अन्नधान्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. जवळपास २ लाख १८ हजार शिधापत्रिकाधारकांनापैकी २ लाख १२ हजार लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वाटप झाले आहे. तर उर्वरित लाभार्थ्यांना लवकरच वाटप पूर्ण होईल.
जिल्ह्यात १७ आश्रयस्थाने
जिल्ह्यात बाहेर राज्य व जिल्ह्यातील मजूर व प्रवाशी अडकले आहे. अशांची राहण्याची आणि जेवनाची व्यवस्था काही संस्थाच्या मदतीने केली जात आहे. यासाठी १७ ठिकाणी शेल्टरहोम स्थापन करण्यात आले असून त्यात ७३७ जण आश्रयास असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.

Web Title: Lockdown is now in the hands of the general public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.