दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी कामधेनू प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 23:33 IST2019-01-10T23:32:26+5:302019-01-10T23:33:41+5:30
जिल्ह्यात सर्वाधिक धानाची शेती केली जाते. मात्र मागील चार पाच वर्षांपासून बदलते वातावरण आणि नैसर्गिक संकटाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे धानाची शेती घाट्याचा सौदा होत चालली आहे.

दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी कामधेनू प्रकल्प
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात सर्वाधिक धानाची शेती केली जाते. मात्र मागील चार पाच वर्षांपासून बदलते वातावरण आणि नैसर्गिक संकटाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे धानाची शेती घाट्याचा सौदा होत चालली आहे. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावत चालली आहे. शेतकऱ्यांना शेतीवर आधारित जोडधंदे उपलब्ध करुन देऊन त्यांचा आर्थिकस्तर उंचाविण्यासाठी अदानी फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. कामधेनू प्रकल्पाच्या माध्यमातून २७ गावांमध्ये दुग्ध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जात आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध उत्पादन हा उत्तम जोडधंदा आहे. गायी, म्हशी यांच्या मलमुत्रापासून शेतकऱ्यांना नि:शुल्क सेंद्रिय खत सुध्दा मिळते. शिवाय दुधाच्या विक्रीतून चारपैसे देखील मिळत असल्याने वर्षभर कुुंटुंबांचा उदरनिर्वाह चालविण्यास शेतकऱ्यांना मदत होवू शकते.जिल्ह्यात दुधाळू जनावरांची संख्या दीड लाखावर आहे. मात्र दुधाळू जनावरांना पौष्टीक आहार आणि त्यांच्या योग्य संगोपनाची माहिती बऱ्याच शेतकऱ्यांना नाही. त्यामुळे त्याचा परिणाम दुग्ध उत्पादनावर होतो. अदानी फाऊंडेशनने नेमकी हीच बाब हेरून तिरोडा तालुक्यातील २७ गावांची निवड करुन तिथे दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी कामधेनू प्रकल्प राबविण्यास सुरूवात केली आहे.
या प्रकल्पातंर्गत निवड केलेल्या गावातील दुधाळू जनावरांची नियमित तपासणी, कृत्रीम रेतन, प्रतिबंधात्मक लसीकरण व शेतकºयांना तज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्फत मार्गदर्शन केले जात आहे. अदानी फाऊंडेशन द्वारा राबविण्यात येणाऱ्या कामधेनू प्रकल्पांतर्गत कृत्रीम रेतनाद्वारे जन्मास आलेल्या नवजात गिर, साहीवाल, थारपारकर आणि मुर्रा जातीच्या वासरांना पाहुन शेतकºयांना गोपालनाची प्रेरणा मिळत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकºयांना शेतीला जोडधंदा उपलब्ध व्हावा तसेच जिल्ह्यातील दुग्ध उत्पादनात वाढ व्हावी हा उद्देश असल्याचे अदानी फाऊंडेशनचे प्रकल्प प्रमुख नितीन शिराळकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
प्रदर्शनीतून सेंद्रिय शेतीवर मार्गदर्शन
शेतीमध्ये रासायनिक खताच्या अतिवापरामुळे शेत जमीन निकृष्ट होत चालली आहे. त्याचा उत्पादनावर परिणाम होत असून शेतकऱ्यांनी वेळीच सावध होत सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे. सेंद्रिय शेतीचे अनेक फायदे असून यामुळे खर्चाची सुध्दा बचत होते. सेंद्रिय शेती करण्याकरीता गांडूळ खत, दर्शपर्णी अर्क, निमास्त्र, ब्रम्हास्त्र व अग्नीअस्त्र या कीड नियंत्रकांचा वापर करण्याचा सल्ला शेतकºयांना प्रदर्शनीचे आयोजन करुन फाऊंडेशन अंतर्गत दिला जात आहे.